नाशिक - भाषाशास्त्र आणि व्याकरण नव्या तंत्रज्ञानात बनविले तर तंत्रज्ञानावर आधारित नवे व्याकरण आणि भाषाशास्त्र उगम पावेल. प्राचीन भारताची भाषाशास्त्र परंपरा खूप जुनी असून, त्याला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे, असे मत अभ्यासक पुण्याचे प्रसाद जोशी यांनी मंगळवारी मांडले. ग्रीक, लॅटिन, आधुनिक भाषाशास्त्रालाही मोठा इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त एचपीटी कला आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयाने भरविलेल्या बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या बाराव्या अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी प्रतिनिधींनी विविध विषयांवरील शोधनिबंधातून प्राच्यविद्येची आधुनिक जगाशी सखोल सांगड घातली. भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्र या विषयावरील सत्रात जोशी बोलत होते. संस्कृतमध्ये बोलताना आणि लिहिताना भाषेच्या नियमांचे महत्त्व आणि निरपेक्षपणे वेदांचे ज्ञान समजून घेणे गरजेचे असल्याचे मत परिषदेचे कार्याध्यक्ष व भांडारकर इन्स्टिट्यूटचे डॉ. गणेथ थिटे यांनी व्यक्त केले.
|