पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : द्राक्षांच्या हंगामाची सांगता झाल्याने पिंपळगावच्या नागरिक आता पिवळाधमक हापूस आंब्याला (Alphonso Mango) पसंती देत असल्याचे चित्र आहे. द्राक्षनगरीतील नागरिक दररोज पाच टन आंब्यावर ताव मारत असल्याची माहिती विक्रेत्यांशी चर्चेतून पुढे आली आहे. यावरून द्राक्षाची पंढरी (City of Grapes) अशी जगभरात गोड ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंतचे नागरिक आमरसाची मनसोक्त चव चाखत असल्याचे स्पष्ट होते. अक्षयतृतीयेनंतर (Akshay Tritiya) आंब्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुबलक प्रमाणात आंबे उपलब्ध असूनही दर तेजीतच आहे. (5 tons of mango is eaten daily in vineyard City Nashik News)
रत्नागिरी, कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात आंबा पिंपळगाव शहरात दाखल होत आहे. गुजरातचा आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. शहरात आंब्याचे चार घाऊक विक्रेते आहेत. त्यांच्या माध्यमातून शहर व परिसरात आंबा वितरित होतो. आंब्याने भरलेले दोन-तीन ट्रक रोज पिंपळगांवच्या गोदामामध्ये खाली होतात. सलग दोन वर्षे लॉकडाऊनुमळे आंबे चाखायला तर सोडाच पाहायलाही मिळाले नाहीत. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यातच आंबा बाजारात उपलब्ध झाला.अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर घरोघरी आमरस झाला. त्यानंतर आंब्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यात उन्हाचा पारा वाढल्याने लोक आमरस खाणे पसंत करीत आहेत. केशरची अजून प्रतीक्षा आहे. मे महिन्यानंतर हापूसचा सिझन संपतो, त्यानंतर गावरान आंबा सुरू होईल. सध्या दररोज पाच टन म्हणजे सुमारे दीड लाख रुपये किमतीचा आंबा शहरात विकला जात आहे.
असे आहेत दर
लालबाग ८० रुपये किलो,
बदाम शंभर रुपये किलो,
हापूस २०० रुपये किलो
स्थानिक आंब्याचा तुटवडा
जूनच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक आंबा बाजारात येईल. मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे यंदा स्थानिक आंब्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे पिंपळगावकरांना आणखी महिनभर तरी हापूस आणि लालबागचीच चव चाखावी लागणार आहे.
"पिंपळगावमध्ये फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी व देवगड हापूस दाखल झाला. अक्षयतृतीयेला आंब्याला मागणी होतीच, पण त्यानंतर मागणी आणखी वाढली. गेल्या चार-पाच दिवसांत दरांमध्ये वाढ झाली आहे. शहरात रोज किमान पाच टन आंबा विक्री होत आहे."
- पंकज व सचिन देव, गुरूकृपा फ्रुट, पिंपळगाव बसवंत
"कोरोनामुळे दोन वर्षे आंब्याचा आस्वाद घेता आला नाही. दर थोडे जास्त असले तरी यावर्षी मनसोक्त चव चाखता येत आहे. रत्नागिरी हापूसला आमची सर्वाधिक पसंती आहे."
- जुगलकिशोर राठी, नागरिक.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.