
साल्हेर (जि. नाशिक) : बागलाणच्या आदिवासी (Tribals) पश्चिम पट्ट्यातील साल्हेर भागात नागरीकांसोबतच जनावरांनाही पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. घोटभर पाण्यासाठी दिसेल त्या पाण्यावर तहान भागविली जात असल्याचे चित्र पाणीटंचाईची (Water Scarcity) साक्ष देत आहे. (Animals roam for water due to water scarcity Nashik News)
पाळीव जनावरांबरोबरच जंगलामधील जनावरांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांना थोडा पाण्याचा ओलावा किंवा पाण्याचे तळे दिसले तरी तहान भागविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. साल्हेर भागात माणसांना वेळेवर पाणी मिळत नाही तर जनावरांना कुठून मिळणार, असे चित्र आहे. साल्हेर ग्रामपंचायतअंतर्गत एकूण सात पाडे येतात. त्यामध्ये पायरपाडा, भिकारसोंडा, महादर, मोठे महादर, भाटांबा, बंधारपाडा, साल्हेर या आदिवासी पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई भासत होती.
यासंदर्भात दैनिक सकाळने पाणीटंचाईविरोधात आवाज उठविल्यानंतर गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी या भागाची पाहणी करून तात्पुरता पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. पाड्यांवर एका टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे चित्र गेल्या कित्येक वर्षापासून या भागातील आदिवासींना बघायला मिळत आहे. जोपर्यंत ठोस पाणीपुरवठा योजना होत नाही तोपर्यंत या भागातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे खासदार सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे आदी लोकप्रतिनिधींनी आश्वासन न देता प्रत्यक्षात कामाला सुरवात करण्याची मागणी केली जात आहे.