नाशिक : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत विशेष शिक्षण मिळते; पण दिव्यांग खेळाडू त्यातही अंध (दृष्टिबाधित) खेळाडूंसाठी कुठलीही तरतूद नसल्यामुळे या खेळाडूंना करिअर अर्धवट सोडावे लागत आहे.
हे विद्यार्थी समाजकल्याण विभागांतर्गत येतात म्हणून क्रीडा विभाग त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि समाजकल्याणकडे खेळासाठी विशेष तरतूद नसल्यामुळे या खेळाडूंना साधा प्रशिक्षकही मिळत नाही.
राज्य सरकारने २०१२ मध्ये क्रीडा धोरण जाहीर करत त्यासाठी १,४३४ कोटी रुपयांची तरतूदही केली. पण या धोरणात दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र उल्लेख न केल्यामुळे या खेळाडूंना क्रीडा धोरणाचा यत्किंचितही फायदा मिळाला नाही.
आता नवीन शैक्षणिक धोरणात एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याची तरतूद करताना दिव्यांग खेळाडूंची अडचण निर्माण झाली आहे. त्यांना प्रशिक्षकच नसल्यामुळे हे विद्यार्थी खेळूच शकणार नाहीत.
आर्थिक परिस्थिती उत्तम असणारे पालक आपल्या मुला-मुलींसाठी खासगी प्रशिक्षक नियुक्त करतात. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. शाळा, महाविद्यालयांत शिक्षणासोबत खेळात प्रावीण्य मिळवलेले दिव्यांग खेळाडू भविष्यात कुठेच चमकत नाहीत.
दिव्यांगांसाठी २६ प्रकारचे खेळ आहेत. यात कांचन पेठे, शेखर नायक, नेहा पावसकर, भावेश भाटिया, खंडू खोतकर, गंगा कदम यांसारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवल्याची माहिती फार थोड्या लोकांना आहे.
भारताच्या क्रिकेट (अंध) संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केल्याची साधी दखलही देशात घेतली जात नाही. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १३ लाख १८ हजार ३६९ दिव्यांग आहेत. तर दोन लाख ५१ हजार ५२९ अंध आहेत.
गेल्या बारा वर्षात ही संख्या तिप्पट झाल्याचा अंदाज वर्तवला जातो. अशा परिस्थितीत देशातील पहिली दिव्यांग परिषद येत्या २९ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये आयोजित केली आहे. यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष, प्रशिक्षक आणि आर्थिक तरतूद करण्याची मागणी करण्यात येणार आहे. या परिषदेतून दिव्यांग खेळाडूंच्या समस्यांना वाचा फुटण्याची अपेक्षा आहे.
दिव्यांग विद्यार्थी हे समाजकल्याण विभागांतर्गत येतात. क्रीडा विभाग हा सर्वसामान्य खेळाडूंसाठी काम करते. त्यामुळे अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांचे साधे निमंत्रण मिळत नाहीत. प्रशिक्षकांअभावी या खेळाडूंना करिअर अर्धवट सोडावे लागते. समाज त्यांच्या कार्याची साधी दखलही घेत नाही.
-डॉ.मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मानद सचिव, (नॅब, नाशिक)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.