
छत्रपतींच्या समाधीसाठी टिळकांनी खडाही लावला नाही : छगन भुजबळ
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधी लोकमान्य टिळकांनी (Lokmany Tilak) बांधली हे धादांत खोटे आहे. ही समाधी शंभू राजेंनी बांधली, मात्र नंतर पेशव्यांच्या काळात समाधीकडे दुर्लक्ष झाले. नंतरच्या काळात महात्मा फुलेंनी (Mahatma Phule) समाधी शोधून स्वच्छता करत पोवाडा लिहिला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने टिळकांनी निधी गोळा केला, परंतु समाधीला साधा खडा सुद्धा लावला नाही, अशी घणाघाती टीका पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी (ता.२) केली.
राज ठाकरेंंनी इतिहासाची पाने चाळावीत - भुजबळ
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभानिमित्त उपस्थित श्री.भुजबळ यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इतिहासाची पाने चाळावीत, असा सल्ला त्यांनी दिला. श्री. भुजबळ म्हणाले, की इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी यासंदर्भात विपुल लेखन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाला तीनशे वर्ष झाल्यानिमित्त १९८० मध्ये प्रकाशित पुस्तकात पुरावे व पत्रव्यवहार नमूद केलेले आहेत. त्यानुसार रायगडावर महाराजांचे निधन झाल्यावर अंत्यविधीनंतर छत्रपती शंभू महाराजांनी येथे समाधी बांधली. नंतरच्या काळात मात्र समाधी दुर्लक्षित राहिली. महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८६९ मध्ये समाधी शोधली, तेथे स्वच्छता केली आणि पहिला पोवाडा लिहिला. छत्रपती शिवाजी जयंती पहिली जयंती फुलेंनी साजरी केली, त्याचेही उल्लेख वृत्तपत्रकात आहेत. त्यावेळी लोकमान्य टिळक अवघ्या तेरा वर्षांचे होते.
हेही वाचा: राज ठाकरेंच टेन्शन नको, आम्ही बघू; पवार, भुजबळांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
टिळकांनी निधी गोळा केला पण...
टिळकांनी समाधी बांधण्यासाठी श्री शिवाजी रायगड मंडळ निधी या नावाने निधी गोळा केला. शाहू महाराजांनीही निधी दिला. परंतु टिळकांनी हयातीत एक खडा सुद्धा बसविला नाही. १९२६ मध्ये इंग्रजांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी स्मारक समितीला पत्र देऊन संकलित निधीसंदर्भात विचारणा केल्यानंतर, पैसे ठेवलेली बँक बुडाल्याचे सांगण्यात आले. यानंतर इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोणी चौथरा व राजपूत पद्धतीचे छत्र उभारल्याचा दावा श्री.भुजबळ यांनी केला. टिळक दोनदा रायगडावर गेल्याचा उल्लेख आहे. पहिल्यांदा नानासाहेब पेशवे व दुसऱ्यांदा रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन त्यानी केले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र दिसले नाही का, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.
दिल्लीतही इतिहास बदलण्याचे प्रयत्न सुरु
दिल्लीत सुद्धा पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांचे योगदान दुर्लक्षित करतांना इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा दावा करताना फुले, शाहू, आंबेडकरांना सुद्धा बाजूला सारणार आहात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तुम्ही फुले, आंबेडकरांचे नाव घेता?
राज ठाकरे यांच्या सभेवर सडेतोड टीका करताना श्री.भुजबळ म्हणाले, की बाबासाहेब पुरंदरे, रामदास स्वामी आणि टिळक यांचे गुणगाण गाण्यासाठी आणि शरद पवार यांना जातीयवादी ठरवण्यासाठीच सभा घेतली आहे असे वाटण्याजोगे सभेतील भाषण होते. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम असून त्यातून येवल्यात शिवश्रृष्टी निर्माण करत आहोत. तुम्ही महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत, त्यांच्याविषयी कधीच काही बोलत नाहीत, असा सवाल श्री.भुजबळ यांनी उपस्थित करत, हा फक्त द्वेष वाढविण्याचा प्रकार असल्याचे सांगितले.
हेही वाचा: भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा
डॉ. रियाज यांनी केली शस्त्रक्रीया
आयुष्यभर मुस्लीम द्वेष करणाऱ्या संभाजी भिडे यांचा सायकलवर पडून खुबा मोडला. त्यांच्यावर शस्रक्रिया डॉ. रियाज उमर मुजावर यांनी केली. डॉ. रियाज यांना नेल्सन मंडेला पारितोषिक देण्याचा कार्यक्रम होता, असे असताना त्यांनी सत्काराला उपस्थित न राहाता शस्त्रक्रिया केल्याचा दावा श्री. भुजबळ यांनी केला.
Web Title: Chhagan Bhujbal Said Lokmanya Tilak Not Built Chhatrapati Shivaji Maharaj Samadhi Criticized Raj Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..