
BJPची ताकद असताना शिंदे गटाचा वरचष्मा; पालकमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली
नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री एकनाश शिंदे गटाकडे गेल्याने भारतीय जनता पक्ष व शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असून, धुसफूस सुरू झाली आहे. भाजपची नाशिकमध्ये ताकद असताना शिंदे गटाकडे पालकमंत्रिपद गेल्याने भविष्यात ताकद वाढून शिंदे गट वरचढ ठरण्याची शंका व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाकडूनही नाशिकचा आग्रह धरला गेल्याने भाजप नेतृत्वाने ऐनवेळी शिंदे गटाला झुकते माप दिल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाकाळात नाशिकला सापत्न वागणूक दिल्याने त्यांना हे पद कसे, असा प्रश्न भाजपतर्फे रविवारी (ता. २६) उपस्थित करण्यात आला आहे, त्यामुळे हा वाद नजीकच्या काळात रंगण्याची चिन्हे आहेत. (CM Eknath Shinde group BJP strong Controversy sparked over post of Guardian Minister nashik Latest Political News)
नाशिक शहरामध्ये भाजपची ताकद मोठी आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये ६६ नगरसेवक निवडून येत सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे. शहरातील चारपैकी तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. दोनपैकी एक खासदार भाजपचा आहे. जिल्हा परिषदेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष, तर नगरपालिका व पंचायत समितीमध्ये भाजपची ताकद आहे.
त्या तुलनेत शिंदे गटाची ताकद अगदीच कमी आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटात विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व नांदगावचे आमदार सुहास कांदेंएवढीच ताकद आहे. पालकमंत्रिपदाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अर्ध्या तासात नवीन यादी जाहीर करण्यात आली.
भाजपलाच आव्हानाची चर्चा
पहिल्या यादीमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची सूत्रे होती. दुसऱ्या यादीत मात्र शिंदे गटाचे भुसे यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. या अर्ध्या तासातील घडामोडींत फडणवीस-शिंदे सरकारमधील वादाला कारणीभूत ठरत आहे. शिंदे गटाला नाशिकमध्ये ताकद वाढवायची आहे. पुण्यामध्ये भाजपची ताकद असली तरी ठाण्याला लागून असलेला नाशिकमध्येदेखील शिंदे यांना गटाचा विस्तार करायचा आहे.
त्यामुळे पालकमंत्रिपद स्वतःकडे घेत भाजपला दे धक्का दिला असला तरी महाजन यांना डावलून भुसे तसेच त्यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ टाकल्याने भविष्यात भाजपलाच आव्हान निर्माण करण्याची चाल खेळली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
महाजनांसाठी आग्रह
दादा भुसे नाशिक जिल्ह्याचे असले तरी स्वतंत्र मालेगाव जिल्ह्यासाठी ते आग्रही आहेत, हा एक विषय असला तरी भुसे यांच्यापेक्षा महाजन यांनी जिल्ह्यावर चांगली पकड ठेवली. त्यांनादेखील नाशिकबद्दल विशेष प्रेम आहे. नाशिक जिल्ह्यात स्वतःचा मतदारसंघ नसल्याने शासनाकडून येणाऱ्या निधीचे समान वाटप होईल, त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाजन किंगमेकर ठरू शकतात, अशी भावना भाजपच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची आहे, त्यामुळे महाजन यांच्याकडे नाशिकची सूत्रे द्यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भाजप नेत्यांची शिंदे गटावर नाराजी
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाचे वाटप केल्यानंतर नाशिकवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत भाजपमधील नाराजी पुढे आली आहे. त्याचा बांध फुटताना नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधण्यात आला.
कोरोनाकाळात नाशिकला सापत्न वागणूक दिली, मग त्यांनाच पालकमंत्रिपद कसे, असा प्रश्न भाजपचे माजी गटनेते जगदीश पाटील यांनी उपस्थित केला आहे. महाजन यांना मंत्रिपदावरून डावलल्याची भावना असून, या संदर्भात लवकरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून व्यथा मांडणार असल्याचे ते म्हणाले. गिरीश महाजन पालकमंत्री झाल्यास सर्वांना न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.