बळीराजासाठी अवकाळी निधी ठरतोय मृगजळ!...शेतकरी हेलपाट्यांनी त्रस्त

farmer in farm.jpg
farmer in farm.jpg

नाशिक : (बुंधाटे) बागलाण तालुक्‍यात ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये क्‍यार व महाचक्री वादाळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतनिधीची घोषणा झाली. ती शासनस्तरावरून संबंधित तालुकास्तरावर वितरितही केली; पण अद्याप डांगसौंदाणे परिसरातील बळीराजाच्या खात्यावर हा मदतनिधी जमा नसल्याने सुमारे 407 खातेदार बळीराजांसाठी या मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरत आहे. 

वेळकाढू धोरणामुळे शासन निर्णयाला हरताळ फासला जात आहे

शेतीच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदतनिधी देण्यासाठी आकस्मिक निधीतून रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय पारित करून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी आठ हजार व बहुवार्षिक (फळपीक) पिकांसाठी हेक्‍टरी 18 हजारांची मदत वितरित करण्याचा शासन निर्णय झाला होता. ही मदत दोन हेक्‍टरपर्यंत लागू केली होती. हा निधी तालुक्‍यातील एका बॅंकेद्वारे गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे. त्या नुसार तहसील कार्यालयाकडून वितरित केले आहेत. पण संबंधित बॅंकेकडून अद्याप ही रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग केली नसल्याने बळीराजा आर्थिक विवंच नाचा सामना करत आहे. त्यामुळे मदतनिधीचे लवकरात लवकर वितरण करण्याचा शासन आदेश असताना संबंधितांच्या वेळकाढू धोरणामुळे शासन निर्णयाला हरताळ फासला जात आहे. 

बळीराजाचे आर्थिक गणित बिघडल्याने तो आर्थिक विवंचनेत 

संबंधित शेतकरी मदतनिधीच्या चौकशीसाठी तहसील कार्यालय ते बॅंक अशी पायपीट करत आहे. आधीच अवकाळीने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडल्याने तो आर्थिक विवंचनेत आहे. तोडकी शासन मदत त्यातही वेळकाढूपणाचे धोरण यामुळे ही मदत बळीराजासाठी मृगजळ ठरत आहे. गाठीला पैसा नाही, अवकाळी निधी वर्ग करण्या साठी संबंधितांनाकडे वेळ नाही, अशा चक्रात येथील बळीराजा सापडला आहे. 

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या रूद्र अवताराने हिरावून घेतला. शासनाने तोडकी मदत जाहीर केली; पण अद्याप तिचा एक रुपयाही आम्हाला मिळाला नाही. संबंधितांकडे अनेकदा चौकशी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. - संतोष परदेशी, नुकसानग्रस्त शेतकरी 

ज्या शेतकऱ्यांचे आयएफसी कोड किंवा खाते नंबर चुकीचे झाले आहेत, त्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. दोन ते तीन दिवसांत त्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी तलाठी कार्यालयात ठेवण्यात येईल. शेतकऱ्यांकडून योग्य ती दुरुस्ती करून त्यांच्या नावे पैसा वर्ग करण्यात येईल. - जितेंद्र इंगळे, तहसीलदार, बागलाण  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com