नाशिक : राज्यातील गट ब (अराजपत्रित) गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरावे, अशी आग्रही मागणी उमेदवारांकडून होते आहे. यापूर्वी महापरीक्षा पोर्टलचा अनुभव बघता पुन्हा गैरप्रकार टाळताना सुशिक्षित बेरोजगारांची आर्थिक लुट थांबविण्याची मागणी होते आहे.
त्यातच राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीदेखील यासंदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविताना ही भरती प्रक्रिया MPSC मार्फत घेण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे आता यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागून असणार आहे.
राज्यस्तरावर शासनाच्या सेवेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाची पदे खासगी कंपन्यांकडून स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्याबाबतची एकत्रित मार्गदर्शक सूचना नुकताच ४ मेस जारी केल्या होत्या. अशात यापूर्वी महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेल्या परीक्षेतील गोंधळाचा प्रकार लक्षात घेता खासगी कंपनीमार्फत परीक्षा घेण्याला राज्यभरातील उमेदवारांचा विरोध वाढतो आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच (MPSC) या परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.
या संदर्भात मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता खासगी कंपन्यांची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळलेली असून त्यांनी स्पर्धा परीक्षा घेताना केलेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दिसून आली आहेत. कंपन्यांकडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या परीक्षा पारदर्शी यंत्रणेद्वारे म्हणजेच शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्यास यात पारदर्शकता येऊ शकते. केरळ सारख्या राज्यात देखील गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाची पदे लोकसेवा आयोगाकडून भरले जातात. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या मागणीचा विचार करता ४ मे ला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना मागे घेण्याबाबत उचित निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.