'अगर दर्द यहॉं मिला है, तो दवा भी यही मिलेगी!'...'त्यांनी' कोरोनालाही लाजवले

yeola home.jpg
yeola home.jpg
Updated on

नाशिक : संकटावर मात करण्याची हिंमत मनात असेल, तर संकट शरण येतेच. याचाच प्रत्यय शहरातील मुस्लिम बांधवांनी दिला आहे. मालेगाव कनेक्‍शन, 15 हजारांवर लोकसंख्या, दाटीवाटीची लोकवस्ती, सर्वत्र गल्ली-बोळ, एका घरात दहा ते वीस जणांचा वावर, अस्वच्छता, अशा अनेक प्रश्‍नांमुळे येथेही मालेगाव होते की काय, अशी भीती असताना या बहाद्दरांनी कोरोनालाही लाजवले आहे. जेथे लाइन लागेल, असे म्हटले जायचे तेथे फक्त 12 जण पॉझिटिव्ह सापडल्याने या हिंमतवीर पठ्ठ्यांच्या लढाईचे कौतुक होत आहे. 

बोलणाऱ्यांचे तोंडच बंद

मालेगावनंतर सर्वाधिक मुस्लिमबहुल लोकसंख्येचे येवला शहर. येथील 50 हजारांपैकी किमान 15 हजार लोकसंख्या मुस्लिम बांधवांची. 12 पैकी चार प्रभाग अन्‌ 23 पैकी सात नगरसेवकही त्यांचेच. शहराच्या उत्तरेला असलेल्या मुस्लिम वस्तीची रचना, लाइफस्टाइल मालेगावसारखीच. येथील बांधवांचा मुख्य व्यवसाय यंत्रमागच, राहणेही दाट लोकवस्तीचेच. नवीन व्यक्ती कुठल्या बोळात घुसला अन्‌ कुठे निघाला, हेही कधी कधी समजत नाही. छोटी- छोटी घरे आणि एका घरात दहा ते वीस माणसे. यामुळे कोरोनाची सुरवात झाली, तेव्हा मालेगाव कनेक्‍शन याच भागात पोचेल आणि या परिसरात रुग्ण संख्येची रांग लागेल, असे म्हटले जायचे. याला पुष्टी मिळाली, ती सर्वांत पहिला रुग्ण याच भागातील निघाल्याने. त्यामुळे लोक भयभीत झाले, पण त्या दिवसापासून आजपर्यंतचा विचार केल्यास अवघ्या तीन कुटुंबांतील 12 जणापर्यंतच कोरोना सीमित राहिला. प्रशासन आणि तालुक्‍याने त्यांची हिंमत, लढाईला दाद दिली. या बहाद्दरांनी रुग्णसंख्येची रांग लागेल, असे म्हणणाऱ्यांचे तोंडच बंद केले. 

"ये कुछ नहीं है', असे म्हणत आधार

सुरवातीला येथेही नात्यागोत्यांमुळे मालेगावची दहशत होती. मात्र, पोलिसांनी बैठकी घेऊन केलेल्या सूचना, मुस्लिम पंच कमिटी, नगरसेवक व समाजसेवकांनी समाजबांधवांमध्ये केलेली जनजागृती आणि काळजी घेण्याचे आवाहन कामी आले. या भागातील बीयूएमएस व बीएएमएस पदवीधारक डॉक्‍टरांनी नियमितपणे सेवा देत तपासणी केली व मानसिक आधारही दिला. मालेगावच्या नातेवाइकांनी "ये कुछ नहीं है', असे म्हणत आधार दिला. मटण, मसाला, चहा, अंडे हे या बांधवांचे खाणे, पण रमजान याच काळात आला. तेव्हाही शरीराला सकस अन्न मिळाल्याने प्रतिकारकशक्ती वाढल्याचे सांगितले जाते. सर्वांनीच पॉवरलूम बंद ठेवले. छोटे रस्ते बंद केले. नमाजही घरात पठण केली. या सर्वांचा परिणाम म्हणजे मोठ्या रेड अलर्ट भागातही बोटावर मोजण्याइतके रुग्ण आहेत. सामूहिक, संघटन शक्ती आणि मानसिक व शारीरिक प्रतिकारक शक्तीत वाढ झाली. यामुळे या भागातील हा आजार मर्यादित राहिला, असेच म्हणावे लागेल. 

निर्मिकावरील अढळ श्रद्धा व उपासना, पैगंबरांच्या वचनांचे आचरण आणि शासकीय आदेशांचे पालन केल्यामुळे त्यांच्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी शारीरिक व मानसिक प्रतिकारक्षमता निर्माण झाली. रमजानच्या उपवसामुळे शारीरिक व आध्यात्मिक मनोबल उंचावले. नमाज, रोजा, जकात, दातृत्व, स्वच्छता, संयम या मूलभूत तत्त्वांच्या आचरणामुळे कोरोनाच्या संकटास मुकाबला करणे शक्‍य झाले. - मैलाना शकूर साहब, येवला 

मुस्लिम बांधवांनी कोरोनाशी खंबीरपणे लढा देऊन साहस व धैर्याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. शांतता, सुव्यवस्था व शिस्तबद्धता कायम राखत, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, समाजातील अनेक कोविड योद्धे या संकटाशी मुकाबला करीत होते. राष्ट्रीय कर्तव्य व समाजहित या मूल्यांना सर्वस्व मानून आपत्तीच्या काळात सामाजिक ऐक्‍य व सौहार्दाच्या भावनेतून केलेले हे कार्य निश्‍चितच अभिमानास पात्र आहे. - शरीफ शाह, सामाजिक कार्यकर्ते, येवला 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com