Nashik News : पालखेडचे लाभधारक येणार अडचणीत; जलवाहिनीने शेतकरी धास्तावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Palkhed Left Canal

Nashik News : पालखेडचे लाभधारक येणार अडचणीत; जलवाहिनीने शेतकरी धास्तावले

अण्णासाहेब बोरगुडे : सकाळ वृत्तसेवा

नैताळे : दिंडोरी, निफाड, येवला व नांदगाव (मनमाड ) तालुक्याला वरदान ठरणाऱ्या पालखेड डाव्या कालव्याला पालखेड- करंजवण धरणातून (Dam) पाणी सोडले जाते. (Farmers intimidated by Karanjwan Manmad water channel meet Collector nashik news)

परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचे रोटेशन पद्धतीने पालखेड डाव्या कालव्याद्वारे पुरवठा केला जातो मात्र मनमाड शहराची तहान भागविण्यासाठी करंजवण धरणातून जलवाहिनी करणाऱ्या प्रस्तावित योजनेला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असून १३ फेब्रुवारीला या कामाचामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे.

मात्र योजनेमुळे पालखेड डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत पालखेड डाव्या कालव्याच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र बोरगुडे यांनी दिली आहे.

करंजवण- मनमाड जलवाहिनी ही शासकिय योजना पूर्ण करण्यापूर्वी पालखेड डाव्या कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी वाटप प्रणालीत बदल करत कॅनालवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाणी आरक्षित करणे आवश्यक आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांना उचल पाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे करंजवण मनमाड पाईपलाईन झाली तर त्यानिमित्ताने पालखेड डाव्या कालव्याला वेळोवेळी येणारे सिंचनाचे व पिण्याचे पाण्याचे रोटेशन कदाचित बंद होईल

अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहेत प्रस्तावित करंजवण मनमाड पाईपलाईनचा शुभारंभ होणार आहे. पण त्यामुळे पालखेड डावा कालव्यावरील लाभार्थी शेतकरी अडचणीत तर येणार नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.

निफाडचे आमदार दिलीपराव बनकर व येवला मतदार संघाचे विद्यमान आमदार माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ हे दोन्ही लोकप्रतिनिधी सध्या विरोधी पक्षात असल्याने या दोघांनी शासनाकडे भांडल्याशिवाय पालखेड डाव्या कालव्याचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहील की नाही याची खात्री नाही.

याकरिता सध्या तरी पालखेड डावा कालव्याच्या लाभधारकांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पालखेड डावा कालव्यावरील पाण्याचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवावे अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे.

मनमाड करंजवण पाईपलाईन होण्यासाठी प्रयत्नशील असलेले आमदार सुहास कांदे हे निफाड तालुक्यातीलच असल्याने त्यांनीही पालखेड डाव्या कालव्याच्या लाभार्थ्याचा विचार करून पाण्याची आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवून पालखेड डावा कालव्यावरील लाभार्थी शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण कायम ठेवावे.

"पालखेड डावा कालव्यावरील पाण्याचे आरक्षण कमी झाले तर हजारो शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचा प्रश्न निर्मान होईल. या करीता आजच निफाड, दिंडोरी, येवला तालुक्यातील लोकप्रतिनिधीने जागृत होण्याची गरज आहेत." - लक्ष्मण गवारे, शेतकरी, रामपूर (ता.निफाड)