मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : कसमादे भागात पावसाने तीन आठवड्यापासून उघडीप दिली नसल्याने उशिराने पेरणी झालेली खरीप पिके आता पिवळी पडू लागली आहेत. भाजीपाला पिके पूर्ण वाया गेली तर फळबागांवर विविध रोगांचे आक्रमक वाढल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. उशिराने झालेली पेरणी पिके सध्या तग धरून असून, आवश्यक मशागत व सूर्यदर्शनाभावी संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ओल्या दुष्काळाची चाहूल शेतकऱ्यांना सतावत आहे. (Latest Marathi News)
दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. डाळींब, सीताफळ, पेरू,पपई, ड्रॅगन फळ, शेवगा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळ पिकांची फुलगळ झाल्याने बागा डोईजड बनल्या आहेत. रब्बी हंगाम आवाक्यात राहील हा दिलासा व्यक्त होत आहे. गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून कसमादे भागात सलग ढगाळ वातावरण व संततधार पावसामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, तूर, कपाशी, जनावरांसाठी हिरवा चारा, भाजीपाला, फळबाग शेती पिके प्रभावित झाली आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात लागवड झालेली खरीप पिके सध्या सुस्थितीत आहेत. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस लागवड झालेली पिके पिवळी पडू लागली आहेत. या पिकांना जगवण्यासाठी भर पावसात उपाय योजना केली जात आहे. निंदणी, कोळपणी, फवारणी या अंतर्गत मशागतीला पाऊस अडथळा निर्माण करत असल्याने पिके हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मका पिकात पोग्यात अळीचे आक्रमक वाढले आहे. जास्तीचे गांडूळ आणि कोवळ्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मर व कुज होत आहे. या संकटामुळे खरिपाच्या उत्पादनात घट होणार आहे.
फळबागांवर रोगांचे आक्रमक
डाळींबासह अन्य फळबागा जास्तीचा पावसामुळे रोगग्रस्त बनल्या आहेत. फुलगळ, बहारगळसह मर व तेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले आहे. डाळींब, सीताफळ, पेरू, पपई, ड्रॅगन फळ, शेवगा पिकांवरील रोगराईला रोखण्यासाठी फवारणीचा उपायाला हवामानाची साथ नसल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे.
शेतीला कोट्यवधींचा फटका
पावसाळ्यात विविध भाजीपाला पिके घेण्याचा कल शेतमळ्यात वास्तव्य शेतकऱ्यांचा असतो. तर नियमितपणे भाजपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकडून बाजार मागणी लक्षात घेऊन वांगे, पालक, शेपू, मेथी, गवार, भेंडी, गिलके, दोडके, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर आदी पिकांना पसंती दिली जाते. सूर्यदर्शन नसल्याने सध्या ही सगळी लागवड प्रभावित झाली आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
''पावसामुळे शेतीचे पीक जगवणे कठीण बनले आहे. डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त होत आहे. फळबागांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतीची कामे ठप्प आहेत.'' - भिकन निकम, फळबाग उत्पादक, दाभाडी
''पिकांना वाचवायचे कसे, हाच प्रश्न सतावत आहे. सर्व पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे. ओल्या दुष्काळाच्या स्पष्ट पाऊलखुणा दिसत आहेत.'' - भाऊसाहेब कोकरे, उत्पादक, दाभाडी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.