वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे सुरू असलेले जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या कामांची सखोल चौकशी करावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले . मात्र त्यांनतर चौकशीच्या भीतीने ठेकेदाराचे धाबे दणाणले असल्याचे चित्र आहे.
जलवाहिन्या टाकण्याच्या कामात झालेला सावळा गोंधळ दडपण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून करण्यात येत असून ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची वस्तुस्थिती देखील समोर आली आहे. (fear of inquiry shaken contractor attempt to suppress chaos of jal jeevan mission work activities at vavi Nashik)
वावी ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या जलजीवन मिशन कामाचा आराखडा व अंदाजपत्रक वारंवार मागणी करून देखील ग्रामस्थांना देण्यात येत नव्हता. अधिकारी व ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवत होते. तर ग्रामपंचायत प्रशासन देखील या कामाबाबत
ठेकेदार व अधिकारीच माहिती देतील असे सांगत होते. सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी खळवाडी, गायत्री नगर, घोटेवाडी रस्त्याच्या बाजूने प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत टाकण्यात आलेल्या वाहिनींची कामे निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर ठेकेदाराची झोप उडाली आहे.
गेली दोन महिने परागंदा असणाऱ्या ठेकेदाराची टीम वावीमध्ये दाखल झाली असून त्यांच्याकडून अर्धवट खोदकाम करून गडण्यात आलेले पाईप नव्याने टाकले जात आहेत. काही ठिकाणी उघड्यावर जमिनीशी समांतर पाईप टाकले आहेत. त्यावर काँक्रीटचा थर देऊन लबाडी लपवण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे.
कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत चौकशी केल्याखेरीज अशा पद्धतीने ठेकेदाराला अभय देण्यात येऊ नये असे सांगितले.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामातील झोल लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर टाकण्यात आलेली जलवाहिनी जागोजागी पुन्हा उकरण्यात आली असून ती निर्धारित खोलीपर्यंत टाकण्यासाठी ठेकेदाराची लगबग सुरू आहे.
मात्र हा एकूणच प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. ग्रामस्थांनी तक्रार केली म्हणून ठेकेदाराकडून दखल घेतली गेली व चौकशीनंतरची कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार गुणवत्तेवर सारवासारव केली जात असल्याचा आरोप या निमित्ताने करण्यात आला आहे.
वावीत सुरू असलेल्या जलजीवनच्या कामांची माहिती पंचायत समिती स्तरावरून अधिकारी सांगत नाहीत. संगमनेर मधील फड नामक ठेकेदाराकडे हे काम असल्याचे सांगितले जाते. वास्तविक सदर ठेकेदार पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भातील अतिशय अनुभवी ठेकेदार मानला जातो.
वावीसह अकरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम याच ठेकेदाराने केले आहे. राज्यभर जीवन प्राधिकरण ची कोट्यावधीची कामे करणाऱ्या या ठेकेदाराकडून वावी गावातील जलजीवन मिशनच्या कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला असे खेदाने नमूद करावे लागेल.
"जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला जुन्या कामाची दुरुस्ती अथवा नवीन काम करू देणार नाही. अधिकाऱ्यांना याबाबत सांगूनही हा प्रकार सुरू राहिला तर ग्रामस्थ टोकाची भूमिका घेतील. योजनेच्या निकृष्ट कामांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी आमची मागणी आहे. कामाची गुणवत्ता गावातील सर्व जनतेला माहिती आहे. ठेकेदाराला प्रशासन पाठीशी घालणार असेल तर आंदोलन करावे लागेल."- गणेश वेलजाळी (तक्रार कर्ते ग्रामस्थ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.