Nashik Cotton Crop Crisis: पांढऱ्या सोन्यातून 500 कोटींची फसवणूक! पावसाअभावी उत्पादनात 70 टक्के घट

Rajapur stunted cotton plants.
Rajapur stunted cotton plants.esakal

येवला : बाजारभावातील चढ-उतार अन्‌ रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील पांढऱ्या सोन्याचे अर्थात कपाशीचे लागवड क्षेत्र घटत आहे. यंदा पावसाअभावी झाडांची खुंटलेली वाढ, बोंडे न लागल्याने यंदा कपाशीच्या ७० ते ८० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत भावातही मंदी असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ५०० ते ५५० कोटींची झळ सहन करावी लागणार आहे. (Fraud of 500 crores from white gold 70 percent reduction in production due to lack of rain nashik)

जिल्हा, खानदेशसह मराठवाड्यालगत असलेल्या तालुक्यांमध्ये १९९५ पासून कपाशीचे पीक घेतले जाते. सुरवातीला कपाशीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली भर घातली. अनेक शेतकऱ्यांच्या अर्थकारणालाही आधार दिला.

मात्र, उत्पादन खर्चात वाढ, रोग व भाव अस्थिर झाल्याने हळूहळू कपाशीचे क्षेत्र काहीसे कमी झाले. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांनी मका व कांद्याचे क्षेत्र वाढविले.

वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नातील घट आणि भावातही अपेक्षित वाढ होत नसल्याने क्षेत्र घटले आहे.

जिल्ह्यातच नव्हे; तर राज्यातही मोठ्या प्रमाणात कपाशीचे क्षेत्र घटल्याने कापसाचे उत्पादन घटले. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने यावर्षी दरात अचानक विक्रमी वाढ झाली आहे.

मागील वर्षी सरासरी आठ ते नऊ हजार रुपये दराने कापूस विकला, तर दोन वर्षांपूर्वी १२ हजारपर्यंत दर पोचले होते. असे असले तरी कपाशी न परवडणारे पीक होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी लागवड क्षेत्रात घट केली आहे.

८० च्या ठिकाणी १०-२० बोंडे

या वर्षी पावसाने सुरवातीलाच उशिराने हजेरी लावल्याने थेट जुलैमध्ये कापसाची लागवड झाली. रिमझिमवर कापूस पीक तगले, पण ऐन वाढीचे आणि बोंडे लागण्याच्या स्थितीतच पावसाचा मोठा खंड पडल्याने कापसाची पूर्ण वाट लागली.

एरवी चार ते सहा फूट उंचीपर्यंत झाड वाढून सरासरी ७०-८० बोंडे यायचे, तेथे यंदा दोन ते तीन फुटातच झाड अडकून अवघे १० ते २० बोंडे आले. जिल्ह्यात ४५ हजार एकरपर्यंत कपाशीचे क्षेत्र वाढले होते.

मात्र, यंदा जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली. जाणकारांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात कापसाचे जिरायती क्षेत्रात ५ ते ८ क्विंटल, तर बागायती क्षेत्रात १२ क्विंटलदरम्या,न तर सरासरी १० क्विंटल उत्पादन निघते.

एकराला सरासरी खर्च ३० ते ४० हजारापर्यंत खर्च येतो. जिल्हात एकरी ८ ते १२ क्विंटल सरासरी कापूस निघतो, तेथेच या वर्षी प्रतिएकरात फक्त १ ते ५, तर सरासरी ४ क्विंटल कापूस निघाला.

माळरानावरील कोरडवाहू शेतातील कापसाचे झाड वाढले नाही अन्‌ त्याला कापूसही लागला नाही. परिणामी, शेतकऱ्यांचा लागवड खर्चही पाण्यात गेला. कपाशीला रब्बीत पाणी देऊन शेतकरी दुबार उत्पादन म्हणजे फरदड घ्यायचे, पण यंदा मुख्य हंगामातच कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली.

Rajapur stunted cotton plants.
Onion Export Ban: कांदा निर्यातबंदीने ‘पवारांना’ पुन्हा बळ! मंत्री डॉ. पवारांच्या अडचणीत भर

भावाचा अन्‌ नुकसानीचा विक्रम

मागील वर्षी क्विंटलला नऊ ते दहा हजार रुपयांचा भाव कपाशीला मिळाला होता. या वर्षी सुरवातीपासून भावाने गटांगळ्या खाल्ल्या. सध्या ६,५०० ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

उत्पन्नात प्रचंड घट झाल्याने हा दर अजिबात परवडणारा नसल्याचे शेतकरी सांगतात. बागायतदार कपाशी उत्पादकांनी भाववाढीच्या भरोशावर अजूनही कापूस घरातच साठवून ठेवला आहे.

५०० कोटीवर उत्पन्न घटले

जिल्ह्यात ९९ हजार ७४५ एकरवर कापूस लागवड झाली होती. या क्षेत्रात सरासरी एकरी १० क्विंटल कापूस निघून सरासरी ७ हजार रुपये भावाने ७०० कोटींचे उत्पादन अपेक्षित होते.

मागील वर्षाप्रमाणे दर मिळाला असता, तर हेच उत्पन्न ९०० ते ९५० कोटी मिळाले असते. मात्र, अल्प पावसामुळे मोठे नुकसान होऊन या वर्षी केवळ सरासरी साडेतीन ते चार क्विंटलच कापूस निघाला.

सरासरी सात हजारांच्या दरानुसार सुमारे २५० ते २८० कोटींच्या आसपास उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात पडले आहे. या हिशोबानुसार दरातली घट व उत्पादन विक्रमी घटल्याने शेतकऱ्यांना ४५० ते ५५० कोटींहून अधिक झळ बसली आहे. काही शेतकऱ्यांना गुंतवलेले भांडवलही मिळालेले नाही.

जिल्ह्यातील सरासरी क्षेत्र

तालुका- सरासरी

मालेगाव- १७७५१

सटाणा- ७८

नांदगाव- ९१६४

निफाड- ५७

सिन्नर- १२६५

येवला- १२००६

एकूण- ४०३२२

"यंदा लागवडीपासून कपाशी अडचणीत सापडली होती. पावसाअभावी यंदा वाढ व बोंडे लागली नाहीत. यंदा राज्य अन्‌ देशातही क्षेत्रात घट झाली. त्यातुलनेत घेतलेले पिकही अपेक्षेप्रमाणे आलेले नाही. एरव्ही कपाशीला ६० ते १०० बोंडे येतात. या वर्षी पाऊस नसल्याने १० ते २० च्या दरम्यान बोंडे आल्याने ६० ते ७० टक्के उत्पादन घटले. कुणालाच अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही अन्‌ विक्रमी आर्थिक नुकसान झाले."-अशोक कुळधर, कृषी अभ्यासक, येवला

Rajapur stunted cotton plants.
Onion Export Ban: निर्यातबंदीमुळे अडकले 170 कंटेनर! मंत्री पीयूष गोयलांशी आज चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com