निफाड (जि. नाशिक) : आधीच कोरोना (Corona) महामारीने शेतीची पुरती वाट लागली होती, कशीतरी शेती उभी केलेल्या येथील शेतकऱ्यांना आभाळ फाटल्यागत धो-धो बरसलेल्या पावसाने अक्षरक्षः उद्दवस्त केले आहे. शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा असलेला शेतकऱ्यांना गुलाब (Gulab Cyclon) वादळाचा फटका बसला आहे. हंगामच पाण्यात गेल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.
सततच्या पावसाने बळावताहेत पिकांवर रोग
निफाड तालुक्यात बळीराजामागे लागलेली अवकाळी पाऊसाची इडा पिडा काही केल्या टळेना. विशेषता तालुक्यात महत्वाचे पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन, मका, द्राक्ष मोठ्या कोसळणाऱ्या पावसाने वाट लावली आहे. वाकद, शिरवाडे, कोळगाव कानळद, देवगाव, रुई, धानोरे, मानोरी, लासलगाव, गोंदेगाव, वाहेगाव भरवस, दहेगाव, गोळेगाव, उगाव, निफाड, शिवडी, जळगाव, कोठुरे, रसलपूरसह ४७ गावांसह तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. देवगाव मंडळातील गावांना मोठी झळ बसली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कांदा, सोयाबीन, मका उत्पादकांना बसला आहे. सोंगणीला आलेले सोयाबिन अक्षरशः शेतात सडत चालले आहे. कांद्याचेही मोठे नुकसान केले आहे. छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. सततच्या पावसाने पाने व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पावसाने होत आहे.
द्राक्षबागेत फांदीला मुळ्या
दररोज हजार दोन हजार रुपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची, अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी फेरायचे हे नित्याचे झाले आहे. द्राक्षबागेत सर्वत्र चिखल झाल्याने फवारणीसाठी ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होत आहे. बहुतांश वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत असून उत्पादक हतबल झाले आहेत. महिनाभरापासून सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागात असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट फांदीला मुळ्या फुटत आहे. नविन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे, यामुळे एकूणच द्राक्ष यंदा दोक्यात आली आहेत. सरसकट पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
''गुलाबच्या फेऱ्यात देवगाव मंडळातील गावाची शेती आणि शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. द्राक्ष, सोयाबीन, मका खरिपाच्या हंगामातील काढणीस आलेली पिके पाण्यामुळे सडली आहेत. आधीच कोरोना महामारीशी दोन हात करीत असताना उद्भवलेले संकट भुईसपाट करणारे ठरले आहे. यात प्रशासनाला मदत करावी, एवढेच मायबाप शेतकरी करत आहे.'' - लहानू मेमाणे, उपसरपंच, देवगाव.
''आधीच शेतमालाचे ढासळत असलेले बाजारभाव, कोरोना महामारीचे संकट, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या संकटामुळे शेतकरींचे झालेले नुकसान कसे भरू काढणार? त्यासाठी त्याला तताडीची मदत करण्याची गरज आहे.'' - गोकुळ कुंदे, शेतकरी, रसलपूर.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.