नाशिक : माजी नौदल अधिकारी तथा इगतपुरी महिंद्र कंपनी सुरक्षाव्यवस्था व फायर ऑफिसर हरीश चौबे यांना देशसेवेत आर्मीमध्ये वडील असल्याने आपसूकच घरातून देशसेवेचे बाळकडू मिळाले. अपघातांमध्ये शेकडो प्रवाशांचा जीव वाचविण्याचे काम करताना नागरिकांचे मिळणारे प्रेम यामुळे जोमाने त्यांना पुन्हा काम करावे असे चौबेंना वाटते. (Harish-Chaubey-saved-lives-of-hundreds-of-passengers-nashik-marathi-news)
शेकडो प्रवाशांचा जीव वाचविणारा 'देवदूत'!
पडघा ते नाशिकदरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये शेकडो प्रवाशांचा जीव वाचविण्याचे काम करताना नागरिकांचे मिळणारे प्रेम यामुळे जोमाने त्यांना पुन्हा काम करावे असे वाटते. मुंबई ते नाशिकदरम्यान औद्योगिक क्षेत्र, वाहतूक महामार्ग, नागरी वस्त्यांमध्ये लागलेल्या आगीतून लाखमोलाच्या मानवी जीवनाबरोबरच आग आटोक्यात आणताना स्वतःचा जीव धोक्यात घालत गरिबांची घरेदेखील विनामूल्य वाचवताना चौबे यांनी स्वतः आर्थिक मदत देत अनेक कुटुंबांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. नौदलात पंधरा वर्षे पूर्ण करीत निवृत्तीनंतर पुन्हा त्याच जोमाने देशसेवेसाठी महिंद्र कंपनी व मुंबई-नाशिक महामार्गावर सुरक्षाव्यवस्था व अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर म्हणू कामकाज पाहत आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील १३ ट्रेकर्सना त्यांनी वाचविले आहे. वाडीवऱ्हे औद्योगिक क्षेत्रातील ॲरेस बायक्युल्स, जिंदाल पॉलीफिल्म आदी कंपन्यांत लागलेल्या आगी आटोक्यात आणताना रात्र-बेरात्री कधीही कर्तव्याचा विसर पडू दिला नाही. तालुक्यासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, पेट्रोलपंप, समृद्धी महामार्ग याचबरोबर पोलिसांना अग्निशमन उपकरण माहिती व आग नियंत्रणात आणण्याचे प्रशिक्षण देत महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग घेत देशसेवा आजही ते जोमाने करत आहे. लॉकडाउनदरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावरून पायी जाणाऱ्या श्रमिकांना नित्याने पुरीभाजी जेवण, ज्यूस, बालकांना दूध, बिस्किट, बंदोबस्तावरील पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांना मदत केली. राष्ट्रीय पातळीवर ओडिशा येथील पूर, सुनामी दरम्यान काम पाहिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मुंबई अग्निशमन दलातर्फे त्यांना ‘सेफ्टी हिरो प्लस अवार्ड २०१९ बेस्ट फायर फायटर ॲन्ड रेस्क्युअर ॲवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.
युवकांनी तंदुरुस्त राहत देशसेवेसाठी सक्षम व्हावे. अपघातप्रसंगी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मदतीसाठी पुढे यावे. २०२१ पर्यंत पन्नास हजार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याचे टार्गेट जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. झीरो अपघात हेच ध्येय असून, तहसीलदार परमेश्वर कासुळे, महिंद्रा कंपनीचे जनरल व्यवस्थापक थॉमस टॉम, महामार्ग घोटी केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, कैलास ढोकणे, जयंत इंगळे, महाव्यवस्थापक महिंद्रा, राजेंद्र शेवाळे, प्रशांत देवरे, शिवम गोयल यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. - हरिष चौबे, सुरक्षाव्यवस्था व फायर ऑफिसर, महिंद्रा कंपनी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.