धरणांच्या तालुक्यालाही पावसाची प्रतीक्षा कायम...अवघा 'इतका'च पाणीसाठा शिल्लक!

dharan.jpg
dharan.jpg

नाशिक : (अस्वली स्टेशन) महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वाधिक धरणांच्या तालुक्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने दारणा, वैतरणासह सगळ्या धरणांत अत्यल्प साठा शिल्लक आहे. पावसाची ओढ अशीच कायम राहिल्यास मराठवाड्यापासून तर मुंबईपर्यंतच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

धरणांच्या तालुक्याला पावसाची प्रतीक्षा

इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठ्या ब्रिटिशकालीन दारणा धरणात रविवारी (ता. २६) सकाळी सहापर्यंत अवघा १२९.९७ दशलक्ष घनफूट (६४.२०) टक्के पाणी आहे. नाशिक, नगरपासून तर थेट मराठवाड्यापर्यंत दारणा धारणातून पाणी पुरविले जाते. याशिवाय दारणा समूहातील भावली धरणात ७९ टक्के, मुकणे २८, वालदेवी ३४, कडवा धरणात २१ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दारणा समूहातील धरणांमध्ये १६३५ दशलक्ष घनफूट (८ टक्के) कमी साठा आहे. त्यामुळे पाऊस न झाल्यास नाशिक, नगरपासून मराठवाड्यातील विविध जिल्हे प्रभावित होणार आहेत. वैतरणा धरणात थोड्या अधिक फरकाने तशीच स्थिती आहे. 

मराठवाड्यावर परिणाम 

मृग नक्षत्राच्या तोंडावर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र १५ दिवसांच्या खंडानंतर निसर्गवादळासोबत हजेरी लावलेल्या पावसाने पुन्हा आठ-दहा दिवसांची ओढ दिली. मात्र राजकोर नक्षत्रात इगतपुरी तालुक्यात एक हजार ४४० मिलिमीटरमध्ये पाऊस बरसला. त्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला. जवळजवळ ४७ टक्के पेरण्या झाल्या पण दारणा, मुकणे, भावली, वाकी खापरी, कडवा या धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर कमी होता. गेल्या दोन महिन्यांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस नसल्याने धरणांतील साठ्याची टक्केवारी तेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे इगतपुरीसह सिन्नर, नगर, राहता, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊन शेतीतंत्र बिघडणार आहे. 

मुंबईवर परिणाम 

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या वैतरणा धरणात १४०.८८ दशलक्ष घनफूट (४१ टक्के) इतकाच साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा निम्म्याहून कमी आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

धरणक्षेत्रात पाऊस 

इगतपुरीतील आतापर्यंतच्या झालेल्या एक हजार ४४० मिलिमीटर पावसात दारणा १२९.९७, भावली ३२.४५, वाकी खापरी ३.६८, भाम २१.७८, मुकणे ५७.६१, कडवा परिसरात १०.३४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा शिल्लक आहे. वैतरणा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत येथे निम्मा पाऊस झाला आहे. 

धरणांतील साठा (दशलक्ष घनफूट) 
धरण पाणीसाठा (२०२०) टक्के पाणीसाठा २०१९ (टक्के) 

दारणा ४,४७९ ६३ ५,३२३ ७४ 
भावली १,१३७ ७९ १,२४२ ८७ 
मुकणे २,०३५ २८ १,७४९ २४ 
समूह ८,६२८ ४६ १०,२६३ ५४ 

(संपादन - किशोरी वाघ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com