"गाडी करून या, आम्ही भाडे देऊ, तुमची काळजी घेऊ''...गुजरात, राजस्थानकडून चक्क पायघड्या!

pomegranates.jpg
pomegranates.jpg

नाशिक : (मालेगाव) "गाडी करून या, आम्ही भाडे देऊ, तुमची काळजी घेऊ,' असा निरोप डाळिंब उत्पादकांकडून कामगारांना दिला जातोय. लॉकडाउन मुळे गावी आलेल्या कामगारांना गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील डाळिंब उत्पादकांकडून कामासाठी पायघड्याच घातल्या जात आहेत. 1 जूनपासून वाहतुकीला परवानगी असल्याने परराज्यातून कामगारांना बोलावण्यात आले आहे. 

असे घडले कुशल कामगार
 
कसमादे पट्टा एके काळी डाळिंबाचा बादशहा होता. मध्यंतरी तेल्या व मररोगामुळे या पिकाला घरघर लागली. रोग हद्दपार झाल्यानंतर शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळले. या भागातील निम्म्यापेक्षा अधिक कामगार डाळिंबावर काम करीत असल्याने त्यातून कुशल कामगार घडत गेले. छाटणी व कलम बांधणे या दोन महत्त्वाच्या कामांत पारंगत असलेल्या कामगारांची संख्या जवळपास 30 हजारांच्या आसपास आहे. 

महाराष्ट्राचाच बोलबाला 

मर व तेल्या रोगामुळे नाशिकसह राज्यातील डाळिंब संकटात असताना गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब आदी राज्यांमध्ये डाळिंब वाढू लागला. देशात इतरत्र कुठेही डाळिंब लागवड झाली, तरी त्यासाठी लागणारी रोपे व कुशल कामगार महाराष्ट्राचेच राहिले आहेत. परिणामी, कुशल कामगारांना परराज्यातून नेहमी मागणी असते. किमान 12 ते 15 हजार कामगार छाटणी व कलम बांधणे (रोप तयार करणे) या कामासाठी जातात. गावागावातील कामगारांचे हे गट महिना-दोन महिन्यांनंतर गावी येतात. परराज्यात काम केल्यास पैसे शिल्लक पडतात. वर्षानुवर्षे हेच काम करीत असल्याने परराज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कामगारांशी चांगले संबंध झाले आहेत. 

मोबदलाही चांगला मिळतो
 
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळामुळे कसमादेतील शेती नेहमीच झोलखावे खात राहते. कुशल कामगारांना परराज्यात चांगला मोबदला मिळतो. त्यामुळे ते या कामात रमले आहेत. छाटणीसाठी या भागात प्रतिझाड 12 ते 15 रुपये मिळतात. परराज्यात 15 ते 25 रुपये मोबदला मिळतो. कलम बांधण्यासाठी येथे तीन ते चार रुपये प्रतिरोपाचे मिळतात. बाहेर पाच ते सहा रुपये मिळतात. शिवाय परराज्यात कामगारांची राहणे व जेवणाची व्यवस्था संबंधित शेतकऱ्याकडे असते. त्यामुळे मजुरांचा मोठा खर्च वाचतो. मजूर रोजाने काम करण्याऐवजी मक्ता पद्धतीने काम करतात. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळतात. हातावर पोट असलेल्या मजुरांपैकी अनेकांनी दुचाकी घेतली. काहींचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. कुटुंब व मुलांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागत असल्याने कुशल कामगारांचा परराज्यात कामाला जाण्याकडे कल असतो. 

परराज्यातील डाळिंब उत्पादकांकडून कामगारांना बोलावणे येत आहे. मोबदलाही चांगला मिळत आहे. सद्यःस्थितीत खबरदारी म्हणून काही दिवस तरी छाटणीसाठी जाणे शक्‍य दिसत नाही. परिस्थिती सामान्य होताच कामगार जाण्यास उत्सुक आहेत. - गोकुळ चौधरी, कामगार ठेकेदार, रावळगाव 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com