
क्रूरतेने मारलेल्या 'त्या' चिमुरडीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ; गुन्हा दाखल
घोटी (जि. नाशिक) : उभाडे ( ता. इगतपुरी ) माळ राणावरील आदिम कातकरी समाजाच्या अल्पवयीन चिमुरडीला मेंढ्या चारण्यासाठी नेत मारहाण करून गळफास लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
अखेर सात दिवसांनंतर चिमुरडीचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संगमनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. (katkari tribal girl brutally beaten finally died treatment during Nashik Latest Marathi Crime News)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उभाडे येथील कातकरी वस्तीमधील तुळसाबई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी आपली मुलगी गौरी ( वय १० ) हिला घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संशयित आरोपी विकास सीताराम कुदनार रा. शिंदोडी ( ता. संगमनेर ) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठवले होते.
काही दिवसांनी चांगले सांभाळत असल्याचे भासवून नंतर गौरी हिस प्रचंड मारहाण करून गळ्याला फास लावून बेशुद्ध अवस्थेत मागील महिन्यात ( ता. २७ ) मध्यरात्री गौरी हिस उभाडे येथील आगीवले कुटुंबीयांच्या झोपडी वजा राहत्या घराजवळ कुटुंबातील सदस्य यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता विकास कुदनार व साथीदारांनी गौरी हिला टाकून पलायन केले.
आपल्या दारात कोण आहे, जाग आल्यावर पाहण्यासाठी काही वेळाने तुळसाबई गेल्या असता त्यांना धक्का बसला लाल चादरी मध्ये गुंडाळून बेशुद्ध अवस्थेत असलेली मुलगी गौरी असल्याचे समजताच हंबरडा फोडला. आवाज ऐकून वस्तीमधील काही कुटुंबातील सदस्य जागे होऊन त्यांनी तिला सिन्नर घोटी मार्गावरील वाहनामधून घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावर श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे,तालुका अध्यक्ष गोकुळ हिलम,सचिव सुनील वाघ यांना घटना समजताच गौरी हिची तब्येत गंभीर असल्याने तिला रूग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सात दिवसांच्या उपचारादरम्यान गौरी हिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काही मेंढपाळ हे पैस्याचे अमिष दाखवून लहान बालके मेंढ्या सोबत घेऊन जात त्यांचा मानसिक शारीरिक छळ करतात या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. आपल्या आई-वडिलांपासून कोसो दूर असलेल्या त्या चिमुरडीने असा कोणता गुन्हा केला असावा इतके निर्दयीपणे तिला गळफास, अंगाला चटके देत क्रूरतेने मारहाण केली.
या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन संबंधीतावर कठोरपणे कारवाहीची मागणी केली आहे. आदिम कातकरी समाजाची इगतपुरी तालुक्यात ( १४०० ) कुटुंब राहतात. यातील काही वीटभट्टी, खडी फोडणे,मासेमारी करून उदरनिर्वाह करत असतात.
गावकुसाला अथवा माळरानावर राहणाऱ्या कुटुंबियांना पैस्याची लालच दाखवून विविध कामाला घेऊन त्यांना बंधबिगारीला लावले जाते. तालुक्यातील अनेक जोडपे लहान बालके यांना वेठबिगारी करिता नेवून मानसिक कौटुंबिक त्रास दिला जातो. याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करून यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची मागणी पुढे येत आहे.