कालव्याला गळती! काढणीस आलेल्या पिकांत शिरले पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

kelzar.jpg
kelzar.jpg

नाशिक/डांगसौंदाणे : केळझर (गोपाळ सागर) धरणाच्या डाव्या कालव्याला सोडलेल्या पूरपाण्यामुळे साकोडे व डांगसौंदाणे शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या कालव्याला साकोडे गावाजवळ मोठी गळती असून, गेली अनेक वर्षे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वेळा पाटबंधारे विभाग आणि स्थानिक शेतकरी वर्गात कालवा गळतीच्या कारणाने संघर्ष झाला आहे. 

शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रया

कालवा दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने पुणे येथील देसाई कन्स्ट्रक्शन कंपनीला चार कोटींचे कंत्राट दिले आहे. ज्या ठिकाणी कालव्याला गळती आहे त्या ठिकाणी कालव्याला सिमेंट पाइप टाकण्याचे हे कंत्राट असून, ठेकेदाराने कामात हलगर्जी केल्यामुळेच हे काम बंद असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करीत आहेत. पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गेली अनेक वर्षे शेतीचे नुकसान होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रया शेतकरी वर्गातून उमटत आहेत. 

काढणीस आलेली पिके गळतीने खराब

गेल्या रब्बी हंगामातही या कालव्याला मोठी गळती झाल्याने स्थानिक आदिवासी शेतकरी वर्गाने आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पाटबंधारे विभागाचे अभियंता अभिजित रौंदळ, संजय पाटील आदींनी नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करीत चार महिन्यांत कालवा दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष उलटूनही काम पूर्ण न झाल्याने गुरुवारी परत कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे खरिपाचा मका, कोबी, उडीद, मूग पूर्णपणे खराब झाला आहे. काढणीस आलेली पिके या गळतीने खराब झाली आहेत. 

केळझर कालव्यातून पाणी जाण्यास आमचा विरोध नाही. मात्र पाण्याच्या गळतीला कायमस्वरूपी बंद केले पाहिजे. आमच्या शेतपिकांचे दर वर्षी मोठे नुकसान होते. - विश्वनाथ गांगुर्डे, शेतकरी, साकोडे 

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांचे कायम होणारे नुकसान लक्षात घेता संबंधित ठेकेदाराला नोटीस देत काम तत्काळ करण्याच्या सूचना कराव्यात व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत संबंधित ठेकेदाराकडून नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळवून द्यावी, अन्यथा रब्बी हंगामात या कालव्यातून पाणी सोडण्यास तीव्र विरोध करू. - गणेश आहिरे, जिल्हा परिषद सदस्य, पठावे दिगर गट 

साकोडे येथील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे काम बंद पडले असेल तर माहिती घेऊन पूरपाणी तत्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात येतील. - जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार 

कालव्यातून पाण्याची ठिकठिकाणी होणारी गळती कमी करण्यासाठी प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने कालव्यातील अडथळे दूर करण्यात येत आहेत. कोरोनामुळे काम थांबले असून, लवकरच ते हाती घेण्यात येईल. - अभिजित रौंदळ, अभियंता, पाटबंधारे विभाग  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com