नेत्यांचा वाढदिवस शासनाच्या खर्चातून? नव्या ट्रेंडचा भार मात्र सरकार अन् जनतेवर

birthday leaders.jpg
birthday leaders.jpg

नाशिक : ‘शिवभोजन थाळी’ राज्य शासनाने जनतेच्या पैशांतून गरिबांसाठी सुरू केलेली योजना. मात्र अनेक राजकीय नेते शहर व जिल्ह्यात आपला वाढदिवस शिवभोजन थाळी वाटपाच्या इव्हेंटने करू लागले आहेत. ‘चमकोगिरी’ची हौस भागविणारे हे नेते शिवभोजन थाळी वाटतात खरं, मात्र यामध्ये थाळीचा खर्च पाच रुपये अन्‌ सरकारचे अनुदान अर्थात, जनतेचा करातील पैसा ४५ रुपये अशी स्थिती आहे. त्यामुळे नेते आपला वाढदिवस शासनाच्या खर्चातून साजरे करू लागल्याचा ‘नवा ट्रेंड’ काही दिवसांपासून सुरू झाल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी कोण पुढाकार घेईल, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. 

नेत्यांच्या वाढदिवसाचा नवा ट्रेंड...‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ 

गेले काही दिवस विविध स्वयंघोषित नेत्यांचे वाढदिवस साजरा करण्याचा शहरात एक नवा पॅटर्न आला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, अर्थात, यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची संख्या कणभर जास्तच भरेल, अशी आहे. हे नेते आपल्या वाढदिवसाला शिवभोजन थाळी केंद्रावर जाऊन समर्थकांसह शिवभोजन वाटपाची छायाचित्रे काढतात. त्यासाठी हार-गुच्छ यापासून तर सत्काराचे साग्रसंगीत कार्यक्रम केले जातात. त्याची छायाचित्र माध्यमांपासून तर सोशल मीडियावर जोरकसपणे व्हायरल केली जातात. एरवी लाखोंच्या गाडीत मिरवून चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये विशेष भरणा आहे. हा कार्यक्रम करताना ज्यांच्यासाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे, त्यांना मात्र शिवभोजन थाळी केंद्रावर नेत्यांचे फोटोसेशन होईपर्यंत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे हे उपाशी लाभार्थी या नेत्यांना काय ‘आशीर्वाद’ अन्‌ ‘सदिच्छा’ देत असतील ‘हे सांगणे न लगे.’ 

वाढदिवस नेत्याचा अन्‌ शिवभोजनाचा भार सरकार व जनतेवर! 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अन्‌ विशेषतः शिवसेनेने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून गरिबांना दहा रुपयांत भोजन मिळावे म्हणून शिवभोजन थाळी ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यात दोन पोळ्या, सुकी भाजी, डाळ आणि भात दिला जातो. सामान्य व्यक्तीचे किमान पोट भरेल, असे त्याचे नियोजन आहे. शहरात अनेक निराधार, बेरोजगार व गरीब प्रवासी या थाळीचा लाभ घेतात. त्यात लाभार्थीकडून दहा रुपये घेण्यात येतात. चाळीस रुपये राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. सध्या कोरोनाची महामारी असल्याने दहा रुपयांऐवजी त्याचे मूल्य पाच रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे ४५ रुपये शासनाच्या तिजोरीतून अर्थात, जनतेच्या पैशांतून अनुदान स्वरूपात दिले जातात. नेते मंडळी आपल्या वाढदिवसाला या थाळी वाटपाचा इव्हेंट करून काय साध्य करतात? हा खरा प्रश्‍न आहे. या सर्व प्रकारात वाढदिवस नेत्याचा, हाल उपाशी गरिबांचे अन्‌ झळ राज्य सरकारला अर्थात, जनतेला अशी स्थिती आहे. नेत्यांच्या या चमकोगिरीत शिवभोजन थाळीचा मूळ उद्देशच हरवून जातो की काय, अशी स्थिती आहे. त्यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे हे प्रकार थांबेल का? असा प्रश्‍न राजकीय कार्यकर्ते व नागरिकांच्या चर्चेत उपस्थित केला जात आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com