नाशिक : नाशिक येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान घेणे शक्य असल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) ‘सकाळ’शी बोलताना दिली. यामुळे नाशिककर साहित्यप्रेमींना संमेलनाची भरगच्च मेजवानी मिळणार आहे.
कौतिकराव ठाले- पाटील यांची माहिती, शासनाला तारखा कळविल्या
कोरोनामुळे या संमेलनाची शक्यता धूसर झाली होती. संसर्ग आटोक्यात आल्यानंतर संमेलन होण्यातील अडथळे दूर झाले. यापूर्वीच हे संमेलन घेण्याचा मान यंदा नाशिककरांना मिळाला आहे. त्यामुळे नाशिकचे लोकहितवादी मंडळ, स्वागत मंडळ आणि साहित्य महामंडळ हे संमेलन व्हावे म्हणून प्रयत्नशील होते. या पार्श्ववभूमीवर ठाले - पाटील ‘सकाऴ' शी बोलताना म्हणाले, ‘साहित्य महामंडळ आणि नाशिकचे स्वागत मंडळ यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीतील चर्चेदरम्यान स्वागत मंडळाने नोव्हेंबरमधील १९, २०, आणि २१ तारखाबाबत तोंडी आणि लेखी माहिती साहित्य महामंडळाला दिली होती. या तारखांवर आम्ही सकारत्मक आहोत. या तारखा शासनाला माहिती म्हणून पाठविल्या आहेत’.
नाशिकमध्ये समितीची चर्चा
स्थगित झालेल्या संमेलनाबाबत गुरुवारी (ता.७) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी साहित्य संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यात यापूर्वीच्या निर्णयाप्रमाणे १९ ते २१ नोव्हेंबरला की जानेवारीमध्ये संमेलन घ्यायचे असे सूत्र राहिले. जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, विश्वास ठाकूर, सुभाष पाटील आदी चर्चेसाठी उपस्थित होते. विधीमंडळाचे अधिवेशन डिसेंबरमध्ये अपेक्षित असल्याने संमेलनासाठी डिसेंबर हा महिना उपयुक्त ठरणार नाही असेही सूचित करण्यात आले होते. याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेतली जाणार होती. त्यामुळे आता ठाले पाटील यांनी वरील तारखांबाबत आपण सकारात्मक आहोत असे म्हटल्याने संमेलन दिवाळीनंतर होणार हे निश्चित मानले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.