Nashik Chhagan Bhujbal : शासनाचा सर्वांत महत्त्वाचा विभाग हा महसूल आहे. याच विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर शासनाचे कर्तृत्व अवलंबून आहे.
लोकाभिमुख योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे, त्यांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी महसूल विभागावर असते. (Minister Bhujbal statement about Government performance depends on revenue department nashik news )
एकप्रकारे महसूल हा शासनाचे नाक, कान आणि डोळे असतो. त्यामुळे महसूल विभागाची जबाबदारी मोठी असून, त्याची जाणीव असायला हवी, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित महसूल दिनाच्या औचित्याने महसूल सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे (नाशिक), माया पाटोळे (मालेगाव) यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी शहापूर येथील अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना आदरांजली अर्पण करण्यात आल्यावर महसूल सप्ताहाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले, की शासकीय १३२ योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी महसूल विभागावर आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महसूल सप्ताहाच्या माध्यमातून विभाग लोकाभिमुख व्हावा, हाच या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी बहुतांश योजना या इ-प्रणालीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वेळेची अन् सामग्रीचीही बचत होते. यासाठी ई-प्रणालीच्या वापरासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत नमो शेतकरी योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्यात येतील. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंद इ-प्रणालीद्वारे करण्याकरिता कृषी विभाग, महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्तरीत्या मोहीम राबवून योजना यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले.
प्रारंभी विभागीय आयुक्त गमे यांनी महसूल सप्ताहाची माहिती दिली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रास्ताविक करताना महसूल विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांनी सूत्रसंचालन केले. मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी पाटोळे यांनी आभार मानले.
२०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमित करा
प्रत्येकाला घर असावे, हे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे शासकीय जागांवरील घरकुलांचे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्यासंदर्भात शासन निर्णय झालेले आहेत. २०११ पूर्वीची अतिक्रमित घरे नियमित करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम राबवावी, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले.
सामाजिक वनीकरणाच्या जमिनीचा प्रश्न
तीन वर्षांसाठी वृक्षलागवडीकरिता ग्रामपंचायतीच्या जमिनी सामाजिक वनीकरण विभागाला तीन वर्षांसाठी देण्यात आल्या. त्यानंतर त्या जमिनी पुन्हा ग्रामपंचायतींना देणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने आज त्या जमिनी पडीक असून, ग्रामपंचायतीलाही त्याचा काही वापर करता येत नाही. आणि सामाजिक वनीकरण विभागाने काहीएक काम केलेले नाही.
अशा जमिनी गावांना परत करण्यासाठीही महसूल विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी केले. तसेच, ग्रामीण भागात शासकीय योजनांसंदर्भात शिबिरे घेताना ती आश्रमशाळांमध्ये घ्यावीत. जेणेकरून विजेचा प्रश्न उद्भवणार नाही आणि आसपासच्या आठ-दहा गाव-पाड्यांना शिबिरांचा लाभ घेता येईल, अशीही सूचना श्री. झिरवाळ यांनी केली.
चुकीमुळे जिल्हा बँक डबघाईला
नाशिक जिल्हा बँक ही कधीकाळी राज्यातील प्रथम क्रमांकाची, तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. परंतु, मधल्या काळात चुकीचे निर्णय बँकेत असलेल्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय कर्मचार्यांनी घेतल्याने आज बँक डबघाईला गेल्याचे सांगत, श्री. भुजबळ म्हणाले, की महसूल विभागाचा कक्ष अधिकारी खूप महत्त्वाचा असून, त्याने जो अहवाल दिला असेल, त्यावरच शासनाकडून निर्णय घेतले जातात.
त्यामुळे कक्ष अधिकाऱ्याने अतिशय जबाबदारीने आपली जबाबदारी पार पाडावी. केवळ मंत्र्यांना खूश करण्यासाठी ‘हो’चा पाढा म्हणू नये, अशीही कोपरखळी श्री. भुजबळ यांनी मारली.
नवीन वाहनांचे वितरण
नाशिक तहसील कार्यालयास एक व्ही.सी. यंत्रणा व संजय गांधी निराधार शाखेस संगणक संच या वेळी देण्यात आला. तसेच, जिल्ह्यात ई शिधापत्रिका देण्याचे सुनिश्चित झाले असल्याने मान्यवरांच्या हस्ते समीर सुभाष हिंगणे, संदीप तुकाराम कांडरकर, विजय संभाजी चव्हाण, अभिषेक कैलास सातळे, स्वाती जयंत घोडके यांना प्रातिनिधीक स्वरूपात ई शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील १२ तहसील कार्यालयांसाठी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.