Chhagan Bhujbal : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्यामुळे मुंबईहून नागपूर व शिर्डीला जाणाऱ्या व्यक्तींना सर्वाधिक फायदा होणार आहे. चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिकची द्राक्षे व कांद्याला परदेशातील बाजारपेठ जलदगतीने उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक ‘समृद्धी’ करणारा हा महामार्ग असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. (Minister Chhagan Bhujbal statement of Nashik grapes and onions marathi news)
समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा (भरवीर ते नांदगाव सदो) हा २५ किलोमीटरचा मार्ग सोमवारी (ता. ४) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा नांदगाव सदो (ता. इगतपुरी) येथे पार पडला. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, आमदार हिरामण खोसकर व्यासपीठावर उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, की समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर वाहने चालविताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून, त्यासाठी एक-दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, की देशाचा विकास हा ‘हिरा’ डेव्हलपमेंट म्हणून होत आहे.
या चारही माध्यमांतून देशाच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील समृद्धी महामार्गाची भूमिकादेखील महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.पालकमंत्री भुसे म्हणाले, की या महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन व तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. महामार्गाचा वापर करताना वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे व वाहनाच्या वेगाचे पालन करणे आवश्यक आहे. (latest marathi news)
समृद्धी महामार्गाचे सहव्यवस्थापक कैलास जाधव, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपजिल्हाधिकारी तथा उपव्यवस्थापक विठ्ठल सोनवणे, तहसीलदार तथा व्यवस्थापिका रचना पवार, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, अनिल ढिकले, मामा ठाकरे, भाजपचे प्रशांत बच्छाव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आदी उपस्थित होते. कैलास जाधव यांनी आभार मानले.
स्थानिकांना प्राधान्य द्या : खोसकर
समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा खुला झाला, तरी येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. पाइपलाइन, रस्त्यांची दुरवस्था आणि इतर प्रश्न सोडविण्याची मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी केली. नांदगाव सदो येथील टोल हा स्थानिकांना चालविण्यासाठी द्यावा, अशी मागणीही त्यांनी ‘एमएसआरडीसी’कडे केली. त्यावर पालकमंत्री भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
मुंबईकरांसाठी फायद्याचा
समृद्धी महामार्गाच्या एकूण ७०१ किलोमीटरपैकी ६२५ किलोमीटर खुला झाला. त्यातही नांदगाव सदो येथून जाणारा समृद्धी महामार्ग आणि मुंबई-आग्रा महामार्गातील अंतर अवघे २७५ मीटर इतकेच आहे. त्यामुळे मुंबईहून शिर्डी व नागपूरला जाणाऱ्या लोकांना याचा फायदा झाला आहे. इगतपुरी ते शिर्डी अवघे सहा तासांत पोचणे शक्य होणार आहे. मात्र, भरवीर ते पडघा हा ७० किलोमीटरचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर ‘जेएनपीटी’पर्यंत पोचणे नाशिककरांना शक्य होईल. त्यामुळे अंतिम टप्पा पूर्ण होईपर्यंत नाशिककरांना वाट बघावी लागणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.