Bharat Jodo Nyaya Yatra : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे प्रचंड संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सरसावले आहेत. भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात नाशिक जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असल्याने या दौऱ्यात राहुल गांधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतील. (nashik Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi in Chandwad marathi news)
त्यासाठी कांदा प्रश्न ज्वलंत असलेल्या चांदवड तालुक्याची निवड अंतिम मानली जात असून, गांधी यांच्या उपस्थितीत रॅली व भव्य शेतकरी मेळावा होण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेचे समन्वयक तथा काँग्रेस पक्षाचे प्रभारी आशिष दुआ व सुशांत मिश्रा यांनी चांदवड तालुक्यात मंगळवारी (ता. २७) येऊन प्रस्तावित स्थळाची पाहणी केली.
माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्याबरोबर बैठक घेत चर्चा केली. कांदा निर्यातबंदीवर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी खासदार शरद पवार रस्त्यावर उतरले होते. १२ डिसेंबर २०२३ ला पवार यांनी चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते.
याचा धागा पकडत काँग्रेसने दुष्काळ, शेतीमालाला भाव नाही, कांदा निर्यातबंदी, कांद्याचे कोसळलेले भाव या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपविरोधात शेतकऱ्यांची असलेली नाराजी घेरण्यासाठी रणनीती आखत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. महाराष्ट्रात न्याय यात्रा दाखल झाल्यावर ती नाशिक जिल्ह्यातून जाईल. (latest marathi news)
या दौरा मार्गात राहुल गांधी यांची मालेगावमध्ये जाहीर सभा होईल. मालेगावातून निघाल्यावर चांदवड येथे त्यासाठी जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. येथील शेतकरी मेळाव्यातून राहुल गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या समन्वयक टीमने चांदवड तालुक्याला भेट देत बैठक घेतली.
या वेळी यात्रेनिमित्त चांदवड येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती आणि स्थळाची पाहणी प्रभारी आशिष दुआ व सुशांत मिश्रा, सचिन गुंजाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी केली. त्यानंतर आढावा बैठक घेतली. बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रम स्थळ, स्वयंसेवकांची नियुक्ती, प्रचार आणि जनसंपर्क यासंबंधी चर्चा झाली.
बैठकीत मेळावा, रॅली यशस्वीतेचा निर्धार करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष संजय जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार, डॉ. राजेंद्र दवंडे, शिवाजी कासव, संपत वक्ते, बाळासाहेब शिंदे, स्वप्नील पाटील, राहुल कोतवाल, विश्वनाथ ठोके, नंदू कोतवाल, संदीप जाधव, दीपांशू जाधव, ओंकार गांगुर्डे आदी उपस्थित होते.
''शेतीमालाला भाव मिळत नाही, कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत चांदवड येथे शेतकरी मेळावा, रॅली आयोजनाबाबत चर्चा झाली. या वेळी राहुल गांधी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत, त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.''- शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार, काँग्रेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.