Nashik News : जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यातच नांदगाव, सिन्नर व चांदवड तालुक्यांमध्ये पशुधनासाठी केवळ दीड महिना पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. तर, जिल्ह्यात सात लाख १५ हजार टन इतका चारा उपलब्ध असून, तो १५ जूनपर्यंत पुरेल इतका पुरेसा आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे धरणांमध्ये पुरेसा साठा नाही. (nashik crisis of fodder shortage in district is enough till June 15 marathi news)
खरीप हंगामातच पुरेसा पाऊस नसल्याने हंगाम वाया गेला होता. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट- सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू झाले होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये तर टँकरने शंभरी गाठली होती. त्यामुळे रब्बी हंगामात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवली. त्यामुळे रब्बी हंगामातील लागवडीखालील पीक क्षेत्रात घट झाली. या परिस्थितीत आवश्यक तो चारा उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत उन्हाळ्याच्या तोंडावरच जिल्ह्यात चारा टंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली. साधारण अडीच महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात येत आहे. सिन्नर, चांदवड व नांदगाव तालुक्यांत यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे चाऱ्याचे उत्पादनही अत्यल्प राहिले.
त्यामुळे या तालुक्यांमध्ये केवळ दोन महिने पुरेल एवढाच चारा सद्यःस्थितीत शिल्लक आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहण्यासाठी चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. त्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा आदेश देण्यात आला आहे. (latest marathi news)
चाराटंचाईची स्थिती लक्षात घेता पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यात पशुपालकांची चांगलीच धावपळ होत आहे. अनेक पशुपालकांना हजारो रुपये खर्च करून चारा खरेदी करावा लागतो. वाढता खर्च व चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसले आहे.
महिन्याला लागतो अडीच लाख टन चारा
जिल्ह्यात १९ लाख ८६ हजार ३०७ इतके पशुधन असल्याची नोंद आहे. या पशुधनासाठी दर महिन्याला दोन लाख ५९ हजार टन इतका चारा लागत असतो. यंदा कमी पर्जन्यमानाचा खरीप व रब्बी हंगामाला फटका बसल्याने पुरेसा चारा उपलब्ध झाला नाही. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सात लाख १५ हजार टन इतका चारा उपलब्ध आहे. हा चारा आगामी दोन ते अडीच महिने पुरेल इतकाच आहे.
''कमी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामात चाऱ्याचे सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने जिल्ह्यातील ज्या-ज्या भागात जी लहान-मोठी धरणे, बंधारे, लघुपाटबंधारे आहेत, त्यांच्या गाळपेरा क्षेत्रात चारा बियाणे पेरणी करण्याबाबतच्या सूचना शासन स्तरावरून प्राप्त झाल्या होत्या. या गाळ पेऱ्यात साधारण दोन हजार हेक्टरवर दोन लाख टन चारा उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने व्यक्त केला आहे. या गाळ पेऱ्यात पाळीव पशूंसाठी चारा तयार करावा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ऑनलाइन बैठकीत दिल्या आहेत.''- डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.