मालेगाव : शहर व परिसर उन्हाने होरपळत आहे. जीवाची काहिली करणारे ऊन पडत असल्याने सर्वत्र जनजीवन प्रभावित झाले आहे. याचा सर्वाधिक फटका आठवडे बाजारांना बसत आहे. कडक उन्हामुळे दिवसभर ग्राहक फिरकत नसले तरी किरकोळ व्यावसायिकांना मात्र उन्हाच्या झळा सहन करत दुकाने थाटावी लागत आहेत. (Due to summer customers in weekly market is less)
उन व लग्न सोहळ्यांमुळे बाजारातील ग्राहकांची वर्दळही मंदावली आहे. विविध आठवडे बाजारांमध्ये दुकाने लावून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेकडो किरकोळ व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहेत. सायंकाळी पाचनंतरच या बाजारांमध्ये गर्दी होत आहे. तालुक्यासह कसमादे परिसरातील शेकडो गावांमध्ये आठवडे बाजार भरतो.
या बाजारात त्या-त्या गावाची जणू आठवड्याची उलाढालच असते. ग्रामीण भागात लग्न सराई व दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांना पुरेसे काम नसल्याने त्याच्या फटका बाजारातील किरकोळ व्यावसायिकांना बसला आहे. कडक उन्हामुळे या बाजारांवर मंदीचे सावट आहे. देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव, चांदवड, नांदगाव या मोठ्या गावांसह अनेक लहान-मोठ्या गावात आठवडे बाजार भरतो.
बाजाराच्या दिवशी मजुरांना मजुरी दिली जाते. या दिवशी कामदेखील बंद असते. बाजारातील उलाढाल लक्षणीय होते. भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ आदींसह सर्वच वस्तू माफक किंमतीत मिळण्याचे आठवडे बाजार महत्वाचे ठिकाण आहे. बहुसंख्य नागरीक आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला बाजारातून खरेदी करतात. (latest marathi news)
उन्हामुळे भाजीपाला खराब होतो. त्यामुळे गृहिणी तो बेताचाच खरेदी करत आहेत. भाजीपाला खराब होऊ नये म्हणून अनेक व्यापारी स्वस्तात भाजीपाला विकत आहे. गेल्या महिन्यापासून कडक उन्हाने आठवडे बाजाराची रौनक कमी झाली आहे. दिवसभर उन्हात व्यवसाय करुन जेमतेम २०० ते ५०० रुपये मिळत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
कसमादेत या गावांना भरतो मोठा बाजार
मालेगाव, कळवण, अभोणा, कनाशी, जयदर, बेज, मोकभणगी, देसराणे, देवळा, उमराणे, मेशी, लोहोणेर, दहिवड, खर्डे, वाखारी, सटाणा, डांगसौंदाणे, जोराने, कंधाने, लखमापूर, ब्राह्मणगाव, ताहाराबाद, मुल्हेर, तळवाडे दिगर, जायखेडा, नामपूर, चांदवड, वडाळी भोई, वडनेर भैरव, काजीसांगवी, उसवाड, सोग्रस, राहुड, दहिवद, नांदगाव, मनमाड, न्यायडोंगरी, बोलठाण, साकोरा, हिसवळ, बाणगाव बुद्रुक, वडनेर, रावळगाव, वडेल, झोडगे, सौंदाणे, मळगाव, येसगाव, दाभाडी, कळवाडी, कजवाडे.
"गेल्या दोन महिन्यांपासून कडक उन्हामुळे आठवडे बाजारात भाजीपाल्याला पुरेशी मागणी नाही. बटाटे महाग झाले असून, शहरातून विविध गावांच्या बाजारात नेतांना मालाची नासधूस होते. कडक उन व दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक जण आठवडे बाजारात येत नाहीत. आठवडे बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिक अडचणीत आले असून, कुटूंब कसे चालवायचे हा प्रश्न आहे. आणखी किमान महिनाभर बाजारावर मंदीचे सावट राहील." - कैलास वाघ, भाजीपाला विक्रेता, ब्राह्मणगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.