भाषा संवाद : आवाज आणि भाषानिर्मिती- वर्ण, स्वर आणि व्यंजने यांचे उच्चार

Marathi Article : मनुष्य या प्राण्याला निसर्गाने बोलण्यासाठी तोंड, ओठ, दात, जीभ (हाड नसलेली), टाळू, स्वरयंत्र आदी अवयव दिलेले आहेत.
Language Communication
Language Communicationesakal

लेखिका : तृप्ती चावरे-तिजारे

मनुष्य या प्राण्याला निसर्गाने बोलण्यासाठी तोंड, ओठ, दात, जीभ (हाड नसलेली), टाळू, स्वरयंत्र आदी अवयव दिलेले आहेत. इतर अनेक प्राण्यांनाही हे सारे अवयव निसर्गाने दिलेले असतात; पण त्यांचा उपयोग ते प्राणी भक्ष्य पकडणे, चावणे, लचका तोडणे, चघळणे, चव घेणे, ओरडणे आदी निसर्गनियमित कार्यांसाठी करीत असतात.

या अवयवांचा उपयोग विशिष्ट ध्वनी निर्मितीसाठी करणारा मनुष्य हा एकमेव प्राणी असावा. विशिष्ट ध्वनी निर्माण करून, पुढे त्याची अर्थपूर्ण भाषा निर्माण करणारा आणि त्यातून विचारांची आदान-प्रदान करणारा मननशील प्राणी, म्हणून त्याला मानव असे म्हटले जाऊ लागले. (saptarang latest article on language communication marathi news)

हजारो वर्षांच्या प्रयत्नांनी मानवाने एखाद-दुसरीच नव्हे, तर हजारो भाषा विकसित केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शब्द आणि अर्थ यांच्या पलीकडे जात, प्रत्येक भाषेच्या सौंदर्याने आपापली ओळखही निर्माण केली. ही ओळख म्हणजे त्या-त्या भाषेतील नादमाधुर्य‌ असेही म्हणता येईल.

प्रत्येक भाषेची आपली म्हणून एक उच्चार व्यवस्था तयार होऊ लागली. या व्यवस्थेचा विकास हा वर्ण, अक्षरे, बाराखडी, शब्द, वाक्ये, व्याकरण, विचार, निबंध, प्रबंध, कथा, कादंबरी, काव्य, नाट्य, साहित्य या क्रमाने आणि अंगांनी होत गेला, असे दिसून येते. त्यापैकी आज आपण ‘वर्ण’ या अंगाचा विचार करणार आहोत.

‘भाषा’ म्हणजे बोलणे. बोलणे ही एक ध्वनीनिर्मित शारीरिक आणि बौद्धिक क्रिया आहे. आपल्याच शरीरातील विशिष्ट यंत्रणा वापरून विशिष्ट ध्वनी निर्माण करता येणे, ही झाली शारीरिक क्रिया आणि या शारीरिक क्रियेला अर्थापर्यंत घेऊन जाणे, ही झाली बौद्धिक क्रिया.

मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याने या दोन्ही क्रियांची सांगड घालून भव्य आणि दिव्य अशी अक्षर वर्णव्यवस्था आणि भाषानिर्मिती केली. मराठी भाषाव्यवस्था ही शरीर आणि बुद्धी यांच्या संगमातून कशी-कशी विकसित होत गेली, हे तिच्या अक्षर वर्णांपासून तपासता येईल.

‘उच्चार’ म्हणून या अक्षर वर्णांचा अर्थ कसा लावायचा, हे मी आवाज आणि उच्चार प्रशिक्षक सचिन चंद्रात्रे यांच्या आवाजसाधना वर्गात शिकले. आवाजसाधना या स्वतंत्र विषयाचा विचार आजवर भारतात पुरेशा प्रमाणात हवा तसा झाला नाही, म्हणून त्यांचे गुरुजी पं. राजेंद्र मणेरीकर यांनी लंडनला राहून आवाजाची विद्या आत्मसात केली आणि भारतात येऊन तिचा अभ्यासक्रम तयार केला.

हा अभ्यासक्रम गाणाऱ्यांसाठी जसा उपयुक्त आहे, तसाच चांगल्या आवाजात बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे, असे मला जाणवले म्हणून मी हा विषय शिकू लागले. या विषयाच्या प्रशिक्षणातून मला जे काही शिकायला मिळाले, तेच मी वाचकांसाठी माझ्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.  (latest marathi news)

Language Communication
नशीब ‘ब्रोकन टेल’चे

गाण्यासाठी किंवा बोलण्यासाठी मुख्य साधन म्हणून लागणारा आवाज निर्माण करणे, हे स्वरयंत्राचे कार्य आहे; परंतु निर्माण झालेल्या आवाजाला विशिष्ट वर्ण, शब्द किंवा अक्षररूप देणे हे मुखविवरातील उच्चार यंत्रणेचे (articulation system) काम असते. मानवी मुखातील पोकळी आणि तिचा सतत बदलणारा आकार म्हणजे एक ध्वनीचमत्कार आहे.

या पोकळीत, जबड्याच्या आत सतत बदल घडवून आणणारी यंत्रणा ही एखाद्या ध्वनिसभागृहासारखी असते. ध्वनिसभागृहाचे मुख्य परिणामकारक घटक म्हणजे वस्तुमान, आकारमान, पोकळी आणि अडथळे. अगदी हेच घटक मानवी जबड्यात निसर्गानेच दिलेले असतात.

ध्वनिशास्त्र असे म्हणते, की या घटकांच्या कमी-अधिक प्रमाणानुसार, ध्वनिसभागृहाची जशी रचना असते, तसाच ध्वनी त्यातून ऐकू येत असतो. अगदी याप्रमाणेच, मानवी मुखातही या घटकांचे प्रमाण कमी-अधिक होत असते, म्हणून प्रत्येकाचे उच्चार वेगवेगळे ऐकू येत असतात.

उच्चारयंत्रणा कार्यान्वित करणे व तिच्यात हवे तसे बदल घडवून आणणे, हे मुखाची आतील पोकळी व तिच्या आजूबाजूच्या शरीरयंत्रणेचे काम असते. मेंदूकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करीत ही सगळी उच्चारयंत्रणा स्वयंचलित पद्धतीप्रमाणे कशी चालते, हा निसर्गाचा एक फार मोठा चमत्कार आणि मानवाला लाभलेले वरदानही आहे.

मुखाच्या आतील पोकळीला आकारमानही असते आणि वस्तुमानही असते. ही पोकळी विविध आकार धारण करीत उघडत असते, ते या आकारमान व पोकळीमुळे; तसेच जीभ, दात, टाळू, ओठ, कंठ आदी विविध अवयवांच्या सहाय्याने अडथळे निर्माण करून विविध उच्चार निर्माण करता येतात अथवा वर्णनिर्मिती होत असते, ते मुखातील वस्तुमानामुळे. उच्चार प्रक्रियेचा सर्वसाधारणपणे प्रवास पुढीलप्रमाणे...

कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्माण होणारा सहज आवाज म्हणजेच आ स्वर किंवा आकार. आ हा स्वर उच्चारत असताना मुखाच्या आतमधील कोणत्याही अवयवाचा अडथळा निर्माण होत नाही म्हणून तो सहज स्वर. तोंड उघडले की कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज बाहेर पडतो तो ‘आ’ हा पहिला स्वर म्हणून तो आदीस्वर. (latest marathi news)

Language Communication
प्लास्टिक पिशव्यांचं स्लो पॉयझन!

‘आ’ हा एक जनक स्वर असून, तो इतर स्वरांना जन्म देतो. ‘आ’ या स्वरात जिभेचा अडथळा निर्माण केला, की जे स्वर तयार होतात ते ‘इ’ आणि ‘ए’. ‘इ’ या स्वरासाठी जिभेचा पाठीमागील भाग वर उचलला जातो; तर ‘ए’ या स्वरासाठी जिभेचा पुढील भाग व जबडा उचलला जातो. ‘आ’ या स्वरात ओठांचा अडथळा निर्माण केला की ‘ओ’ आणि ‘उ’ स्वर तयार होतात.

यापैकी ओठ किंचित लांब ठेवून ‘ओ’ हा स्वर निर्माण करता येतो; तर ओठांचा चंबू केला की ‘उ’ हा स्वर निर्माण करता येतो. उच्चारांच्या दृष्टीने विचार केला, तर आ, इ, ए, उ आणि ओ या पाच स्वरांच्या उच्चारणाची पद्धत समजणे आवश्यक आहे. या पाचही स्वरांसाठी तोंड उघडूनच उच्चार करावा लागतो. उत्तम स्वरनिर्मिती करता येणे, हा भाषा प्रवासाचा पाया आहे. त्यावरच पुढे भाषेची सगळी भिस्त अवलंबून असते. भाषेची इमारत उभी करताना पुढचा भाग येतो, तो व्यंजनांचा.

उच्चारशास्त्राच्या दृष्टीने व्यंजनांच्या बाराखडीकडे कसे पाहावे, याचा एक दृष्टिकोन आवाजसाधना सांगते, तो असा : कोणत्याही व्यंजनाला, शब्दाला किंवा वाक्याला स्वराशिवाय अस्तित्व नसते, हा पहिला नियम. प्रत्येक व्यंजन हे स्वरांत असते, हा दुसरा आणि कुठल्याही वर्णाचा अगर शब्दाचा उच्चार हा स्वराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे वर्णाच्या अगर शब्दाच्या शेवटी स्वर हा लागतोच, हा तिसरा नियम.

क म्हणजे क अधिक अ, का म्हणजे क अधिक आ, की म्हणजे क अधिक ई... याप्रमाणे स्वर आणि व्यंजनांची भाषा एकमेकांना जोडणारी आहे. मराठी बाराखडी म्हणजे उच्चारांचे विशिष्ट वर्गीकरण आहे. ‘क’ वर्णगट हा कंठ्य, म्हणजे कंठ स्थानापासून अडथळा निर्माण करून उच्चारला जातो.

याचप्रमाणे च वर्णगट हा तालव्य, त वर्णगट हा जिव्हा दंतव्य, ट वर्णगट हा मूर्धन्य, प वर्णगट हा ओष्ठ्य, य वर्णगट हा जिव्हाकंठ्य, तर ष वर्णगट घर्ष अशा विविध यंत्रणांच्या अडथळ्यातून वर्णमाला आणि शब्दांची निर्मिती होत असते. याविषयी लेखमालेच्या शेवटी एक स्वतंत्र लेख लिहिणार आहे.

तूर्तास विषय उच्चार संवादाचा आहे. ज्याप्रमाणे स्वर आणि व्यंजन यांच्या उच्चारांशी संवाद साधणे, हे शरीर आणि बुद्धिप्रक्रियेशी निगडित असते, त्याचप्रमाणे शब्दांशी संवाद साधणे हे मन आणि भावनेतून घडणाऱ्या भाषा प्रक्रियेशी कसे निगडित असते, ते पाहूया पुढील भागात. 

(क्रमशः)

Language Communication
काळ्या सूर्याचे विलोभनीय दर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com