खेडलेझुंगे : सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी वातावरणात ओझोनची छत्री आहे. ओझोनमुळे सजीवांचे संरक्षण होऊन त्यांचे अस्तित्व टिकून आहे. तरीही उन्हाळ्यात पारा ४० अंशाच्या पार जातो तेव्हा सर्वांच्याच जीवाची काहीली होते.
सध्या वाढत्या तापमानामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या उन्हापासून बागांचे संरक्षण करण्यासाठी खेडलेझुंगे, धारणगाव खडक, सारोळेथडी, कोळगाव व परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आच्छादन टाकण्यास सुरुवात केली आहे. (Nashik Struggle to save pomegranate orchards due to intense heat news)
खेडलेझुंगे (ता. निफाड) येथील शेतकरी संदिप घोटेकर यांनी त्यांच्या साडेतीन एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी संपूर्ण बागेला नेटचे आच्छादन दिले. या प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे. उन्हापासून डाळिंब वाचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आच्छादनाचे फायदे
नेटच्या संरक्षणामुळे उन्हाचा परिणाम फळांवर आणि झाडांवर होत नाही. तसेच, बागेवर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. फळांचा आणि आतील दाण्यांचा रंग, आकार, गुणवत्ता, चव, रसाचे प्रमाण यामध्ये सुधारणा होते.
बाजारभाव वाढूनही अत्यल्प उत्पन्न
डाळिंबाच्या बागांवर ऊकडी, करपा, बुरशी, तेल्या, मररोग आदींसह विविध रोग पडत असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ वातावरणामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. (latest marathi news)
तीन महिने जोखमीचे
निफाड पूर्व परिसरातील शेतकऱ्यांना गोदावरी खोरे आणि कालव्यांची साथ असल्याने शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आहे. बागायती परिसरात फळबाग आणि ऊस लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यंदा दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हळूहळू पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने मानवी वापरासाठी व जनावरांना पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत असल्याने शेतीसाठी पाणी कमी पडत आहेत. फळबागा, ऊस पिकालाही बारमाही पाणी लागत असल्याने पुढील काळात विकत पाणी घेऊन बागा वाचविण्याची वेळ येऊ शकते. आगामी तीन महिने जोखमीचे ठरणार आहे.
"परिसरात उष्णतेसोबत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे फळेही तडकली जात आहेत. फळांवर चट्टे पडून दर्जाही ढासळतो. मोठ्या कसरतीने बाग वाचवावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होते."- योगेश घोटेकर, डाळिंब उत्पादक, खेडलेझुंगे
"उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी उपलब्तेनुसार जुन्या साड्या, कापडाचा वापर करतात किंवा नेटच्या सहाय्याने डाळिंब बागेला आच्छादन देऊन फळबागा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अतिरिक्त खर्च येत आहे. परंतु, योग्य भाव मिळणे गरजेचे आहे."
- दिलीप घोटेकर, डाळिंब उत्पादक, खेडलेझुंगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.