Nashik Water Crisis: उन्हाळ कांद्याचे भवितव्य चणकापूरसह इतर धरणांच्या आवर्तनावर अवलंबून!

Summer onion
Summer onionesakal

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती असली तरी लेट खरीप व उन्हाळ कांदा लागवडीची धूम सुरू आहे.

शेततळे व विहिरीच्या पाण्याच्या भरोवशावर कांदा लागवड केली जात आहे. कसमादेतील हरणबारी, केळझर, पुनंद, चणकापूर आदी धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे. केळझरमधून सिंचनासाठी आवर्तन सोडले जाणार आहे.

चणकापूर, पुनंद या धरणांमधून सिंचनासाठी किमान एक आवर्तन मिळाल्यास उन्हाळ कांद्याचे उत्पादन वाढू शकेल. उन्हाळ कांद्याचे भवितव्य बहुतांश धरणांच्या आवर्तनावर अवलंबून आहे. (Nashik Water Crisis Fate of summer onion depends on circulation of Chankapur and other dams)

तालुक्यासह कसमादेत या वर्षी पुरेसा पाऊस झाला नाही. मालेगाव तालुका तर दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. इतर तालुक्यांमध्येही जेमतेमच पाऊस झाला. मका, बाजरी या खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न निम्म्याने घटले.

उत्पादनाची शाश्‍वती नसल्याने व कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मका व बाजरीचे पीक अर्धवट काढून त्याचा जनावरांचा चारा म्हणून वापर केला. या पिकांच्या जागेवर लेट खरीपातील कांदा लागवड करण्यात आली आहे.

दोन महिन्यांपासून कांदा लागवड जोमाने सुरू आहे. खरीप हंगामातील लाल कांदा सध्या बाजारात येत आहे. लाल कांद्याचे उत्पन्न एरवीपेक्षा कमी आहे.

नव्या वर्षाच्या सुरवातीला लेट खरिपाचा कांदा बाजारात येऊ शकेल. सध्या उन्हाळ कांदा लागवड सुरू आहे. कांदा लागवडीसाठी अनेक गावांना मजूर टंचाई जाणवत आहे. इतर पिके व भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीलाच पसंती दिली आहे.

Summer onion
Latur Water Crisis : जळकोटला ९० टक्के जलस्रोत तळाला; हिवाळ्यापासूनच तालुक्यात पाण्याची टंचाई

शेततळे व विहिरींच्या पाण्याच्या भरोवशावर लागवड केली जात आहे. हरणबारी धरणातून सिंचनासाठी आवर्तन मिळणार असल्याने मोसम खोऱ्यातील शेतीला दिलासा मिळणार आहे. केळझर, पुनंद व चणकापूर या धरणांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे चणकापूरमधील उपलब्ध पाणी मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन केले जाणार आहे.

पिण्यासाठीच्या आवर्तनाबरेाबरच सिंचनासाठी किमान एक आवर्तन देता येऊ शकेल. एकूणच धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन मिळाल्यास कांदा उत्पादकांना दिलासा मिळू शकेल.

"हरणबारी धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने सोडली जाणार आहेत. पाण्याचे योग्य नियोजन करुन चणकापूर धरणातून किमान दोन आवर्तने सिंचनासाठी मिळायला हवीत. चणकापूर व पुनंद धरणातून सिंचनासाठी आवर्तन मिळाल्यास उन्हाळी कांदा व फळशेती जगू शकेल. दुष्काळी परिस्थिती व बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आवर्तनाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा."- डॉ. जयंत पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (शरद पवार गट), मालेगाव

Summer onion
Nashik Water Crisis: उन्हाळ्यात पाणीटंचाईचा होणार विस्फोट! येवल्यात 91 गावे-वाड्यावर टँकरची आवश्यकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com