त्र्यंबकेश्वर (नाशिक) : जिल्हयातील धार्मिक स्थळांमध्ये त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लिन होण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. राज्यातील वारकरी संप्रदायासाठी निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर एक ऊर्जास्थान आहे. मंदिर आणि मंदिराच्या परिसराचा हवा तसा विकास झालेला नव्हता, त्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी त्याचा केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेशाला केंद्रीय पर्यटन विभागाने तत्वतः मान्यता दिली आहे.
वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान असलेले संत निवृत्तीनाथांचे मंदिर व परिसराचा पुरेसा विकास झालेला नाही. निधीअभावी अनेक कामे करता येत नसल्याने याबाबत पाठपुरावा करूनही फारसे काही हाती लागत नव्हते. देशविदेशातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मंडळी येथे येत असतात, त्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी वाव असल्याने याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी पर्यटन मंत्रालयाकडे मागणी केली होती.
प्रसाद योजनेत देसभरातील धार्मिक स्थळांच्या विकासाला केंद्राने चालना दिलेली आहे. त्यात विविध कामे सुरू आहेत. याबाबत आज केंद्राच्या पर्यटन विभागाची बैठक झाली. केंद्रीय पर्यटन विभागाचे सचिव अध्यक्षस्थानी होते. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराची आख्यायिका, राज्यातीलच नव्हे तर देशभरातील वारकरी संप्रादायाची निवृत्तीनाथ मंदिरावर असलेली श्रध्दा, मंदिरामुळे राज्याच्या संस्कृतीला मिळणारी ऊर्जा, मंदिराचे धार्मिक महत्व आदी मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली. वारकरी संप्रदायात मंदिराचे असलेले महत्व लक्षात घेऊन मंदिर आणि परिसराचा विकास होणे गरजेचे असल्याच्या भूमिकेतून बैठकीत संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचा प्रसाद योजनेत समावेशाच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता देण्यात आली. बैठकीस अतिरिक्त सचिव श्रीमती बरार, अवर सचिव शाम वर्मा, राज्याच्या सचिव वल्सा नायर, उपसचिव दांडेकर, एमटीडीसीचे वावधाने आदी उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. त्यात केंद्राच्या पर्यटन विभागाने संत निवृत्तीनाथ मंदिराचा प्रसाद योजनेत समावेशास तत्वतः मान्यता दिली.
वारकरी मंडळींचेही साकडे
राज्यातून तसेच देशभरातून आलेला प्रत्येक भाविक त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात नतमस्तक होतात. वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचे अनन्य साधारण महत्व असून त्यांच्या दृष्टीने निवृत्तीनाथ मंदिर एक उर्जास्थानच आहे. तरीही विकासापासून मंदिर आजही उपेक्षितच असल्याने त्रंबकवासियांसह राज्यातील वारकरी संप्रदायात नाराजीचा सूर होता. पर्यटन मंत्रालयातील अवर सचिव शाम वर्मा यांच्यासह आठवडयाभरापूर्वी मंदिरात जात पाहणी केली होती. वारकरी संप्रदायाचे रामकृष्ण लहवितकर महाराज, मोहन जाधव, सागर शिंदे, सुदाम घाडगे, त्र्यंबकराव गायकवाड, नीलेश गाढवे, वैभव गाढवे, तुपे महाराज, वाघचौरे महाराज, शिवा आडके, तुकाराम शिंदे, सूरज शिंदे आदींनी भजनाचा गजर करत निवृत्तीनाथ मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश करण्याचे साकडे वर्मा यांना घातले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.