
Narhari Zirwal| अविश्वास दाखल करण्यासाठी नोटीसचं बजवावी लागते; विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांची प्रतिक्रिया
नाशिक : ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावर प्रथमच माध्यमांसमोर भाष्य केले असून, त्यांनी नियमाचा आधार घेत प्रतिक्रिया दिली आहे.
एक नोटीस बजावून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. साधा सरपंचावर जरी अविश्वास ठराव आणायचा असल्यास त्याला नोटीस बजवावी लागते, असे झिरवाळ यांनी यावेळी सांगितले. (notice to be served to file an antitrust reaction of Deputy Speaker of Legislative Assembly narhari zirwal nashik news)
राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्याच दरम्यान राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला गेला, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
त्यामुळे त्यांनी १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाच्या संदर्भातील विषय थेट न्यायालयात गेला होता. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे संपूर्ण देशभरात चर्चेत आले होते.
यावर नाशिकमध्ये शुक्रवारी (ता.१७) झिरवाळ यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, एक नोटीस बजावून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. साधा सरपंचावर जरी अविश्वास ठराव आणायचा असल्यास त्याला नोटीस बजवावी लागते.
त्यानंतर ओळख परेड होते किंवा त्यांचे म्हणणे सांगितले जाते आणि मग सरपंचावर अविश्वास ठराव आणला जातो. तर माझी नियुक्ती ही सभागृहात झाली होती. तिथेच माझ्यावर अविश्वास ठराव आणला गेला पाहिजे ना? इथे तर फक्त नोटीस पाठविली होती. त्याला अविश्वास ठराव म्हणत नाही.
अविश्वास ठराव म्हणजे बहुमत घ्यावे लागते आणि तरचं माझ्यावर अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल ना, इथे तसे झाले नाही, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. ज्या सभागृहाने माझी उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याच सभागृहात माझ्याविरोधात अविश्वास ठराव येणं अपेक्षित आहे. मात्र तसे झालेले नाही.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
तसेच मेलवरून मला पाठवलेली नोटीस हा अविश्वास ठराव असेल आणि मी त्यानंतर घेतलेले निर्णय योग्य नसतील तर ज्या प्रमाणे आमदार अपात्रतेची कारवाई अयोग्य ठरेल, त्याचप्रमाणे नव्या सरकारमधील माझ्या उपस्थितीत झालेला नव्या अध्यक्षांचा शपथविधी कसा वैध धरता येईल? हा अत्यंत महत्त्वाचा सवालही झिरवळ यांनी यावेळी उपस्थित केला.
आता हे बंद झाले पाहिजे
सरकार म्हणून राज्यात जो विस्कळीत पणा आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. आता हे एकदाचे बंद झाले पाहिजे. आम्ही रोज तेच ऐकतो. यात आमचे प्रश्न तसेच राहतात.
अजूनही कुठेही ताळमेळ नाही. कोरोनाने दीड दोन वर्ष, २० वर्ष मागे गेले आहे. कोरोना हे नैसर्गिक संकट होते पण हे आपले कृत्रिम संकट आहे असेही नरहरी झिरवळ यांनी यावेळी सांगितले.
भुसे यांनी राऊत यांची उडविली खिल्ली
जे संपादक अटकेच्या काळात तुरुंगातून अग्रलेख लिहून पाठवत होते. वेगवेगळ्या कमेंट सहजपणे माध्यमांपर्यंत पोहोचवत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचे का जाहीर केले नाही? असा सवाल करीत पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे खासदार संजय राऊत यांच्या हल्ल्याच्या विधानाची खिल्ली उडवली.
यावेळी त्यांनी राऊत हे मोठे नेते आहेत, ते तुरुंगात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे बाहेरपर्यंत पोहोचवू शकले असते. मात्र, त्याबाबत ते आता सांगत आहेत. आम्ही त्यांना आधीपासून पाहत आलो आहे. आता त्यांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी, एवढेच सांगावेसे वाटते, असा टोलाही भुसे यांनी यावेळी लगावला.