Nashik : उन्हामुळे डाळिंबाला कही खूशी कही गम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pomegranates

Nashik : उन्हामुळे डाळिंबाला कही खूशी कही गम

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यासह कसमादे पट्ट्यात तीन महिन्यापासून कडक उन्हाचा (Scorching Summer) मुक्काम कायम आहे. ऊन कमी होण्याचे नाव घेत नाही. उन्हाने या वर्षी मालेगावकर व लग्न सोहळ्यातील वऱ्हाडींचा चांगलाच घाम काढला आहे. कडक उन्हामुळे सद्यस्थितीत कसमादेतील डाळींब (Pomegranate) बागा पूर्णपणे रोगविरहीत आहेत. तापमानामुळे बागांना स्प्रेची संख्याही कमी झाली आहे. उन्हामुळे फळांचा आकार म्हणावा तसा मोठा होत नाही. शिवाय फळाला चट्टे पडण्याची भीती आहे. एकूणच चांगला भाव मिळत असलेल्या डाळींबाची कसमादेतील अवस्था ‘कही खुशी- कही गम’ अशी आहे. (Pomegranate blackened due to scorching heat Nashik agriculture news)

कसमादे डाळींबाचे माहेरघर आहे. डाळींबाने कसमादेचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. कसमादेला सुबत्ता मिळवून देण्यात डाळींबाचा सिंहाचा वाटा आहे. मुळात या भागातील शेतकरी प्रयोगशील आहेत. मर व तेल्या रोगामुळे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांनी डाळींबाऐवजी अन्य फळ पिकांकडे लक्ष केंद्रीत केले. मात्र, डाळींबाएवढा पैसा इतर फळपिकांमध्ये मिळत नाही. मर व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेल्या दोन वर्षापासून शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळले आहेत. कोरोना काळातही डाळिंबाने शेतकऱ्यांना साथ दिली. दोन वर्षापासून पन्नास रुपयांपेक्षा कमी दर मिळाला नसल्याने डाळींब शेती वाढू लागली आहे.

वर्षभरापासून डाळींबाचे भाव चांगले आहेत. दिवाळीनंतर शंभरी ओलां डलेला डाळींब एप्रिल-मे मध्ये दीडशे रुपये किलोपर्यंत विकला गेला. काही शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम डाळिंबाला १७० रुपयापर्यंत भाव मिळाला. कसमादेत मृग, हस्त व आंबे अशा तिन्ही बहारात उत्पन्न घेतले जाते. यात प्रामुख्याने मृग व आंबे बहार अधिक शेतकरी धरतात. हस्त बहारात उत्पन्न जेमतेमच होते. भाव मात्र चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आंबे बहाराबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत. कसमादेत तीन महिन्यापासून उन्हाचा कहर सुरु आहे. येथील पारा ४२ ते ४४ अंशादरम्यान असल्याने त्याचे अनेक फायदे, तोटे आहेत. तापमानामुळे मर व तेल्या रोग सद्यस्थितीत तरी हद्दपार झाला आहे. उन्हामुळे फळाचा आकार पुरेसा वाढत नसला तरी पाऊस पडल्यानंतर तो वाढू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कसमादेत पंधरा ते वीस हजार हेक्टरवर आंबे बहाराचे उत्पन्न घेतले जात आहे. भविष्यात नैसर्गिक परिस्थिती अनुकूल राहिल्यास व भाव टिकून राहिल्यास या भागातील शेती अर्थव्यवस्थेला डाळींब चालना देऊ शकेल.

कडक उन्हाचा पिकावर परिणाम
फायदे
* रोगविरहीत बागा
* मर व तेल्या रोग सद्यस्थितीत हद्दपार
* स्प्रेची संख्या घटली


तोटे
* आंबे बहारातील फळाचा आकार घटला
* फळाला चट्टे (डाग) पडण्याची भीती

"फळपिकांमध्ये शेतकऱ्यांना हमखास व पुरेसे पैसे मिळवून देणारे डाळींब हे एकमेव पीक आहे. शेतकऱ्यांना ते वरदान ठरले आहे. तापमानवाढीचे काही फायदे- तोटे आहेत. वर्षापासून डाळींबाचे भाव टिकून आहेत. मृग व हस्त बहारातील पिकाला चांगला भाव मिळाला. आंबे बहाराच्या बागा उत्तम स्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी बागांची निगा राखावी. तसेच तरुण शेतकऱ्यांनी डाळींब पिकाकडे वळावे. डाळिंबाला चांगले भविष्य असून, तरुणांनी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घ्यावे. " - अरुण देवरे. उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक संघ, पुणे