सिन्नर : सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना साई भक्तांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. न्हाई प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी नियमित गस्त नसणे, अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ब्लॅक स्पॉट्स कडे झालेले दुर्लक्ष प्रवाशांच्या जीविकास धोका निर्माण करणारे ठरले आहे.
अर्धवट बांधकाम असताना रस्ता खुला करण्यात आला आणि टोल वसुली दणक्यात सुरू झाली. रस्त्याच्या नियमित लेखभालीचे काम परप्रांतीय ठेकेदाराने करायचे की स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी, यात मतभेद असल्यामुळे प्रवाशांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. (Sai palkhi devotees travel on Shirdi highway in problem NHAI neglect of safety measures Nashik News)
नाशिक-पुणे महामार्गावरील गुरेवाडी फाटा ते नगर- मनमाड महामार्गावरील सावळी विहीर फाटा यादरम्यान शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जवळपास 80% पर्यंत पूर्ण झाले आहे.
रुंदीकरण झाल्यामुळे या महामार्गवरील अपघात कमी होतील ही अपेक्षा न्हाई प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फोल ठरली आहे. रस्त्याच्या देखभालीच्या कंत्राटावरून या ठिकाणी वेगळ्या वादाला वेगळे वळण लागले आहे.
त्यातूनच गेल्या एक महिन्यापासून रात्रीच्या वेळी महामार्गावर गस्त घालणारे टोल प्रशासनाचे वाहन जागेवर उभे आहे. रुग्णवाहिकेचे भाडे कोणी द्यायचे असा प्रश्न आहे. याशिवाय रस्त्याची नियमित देखभाल करण्यासाठी देखील माणसे येत नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
वावी येथे असलेल्या टोल नाक्यावरून संपूर्ण महामार्गाच्या देखभालीचे नियंत्रण करण्यात येते. याच ठिकाणी रुग्णवाहिका तैनात असतात. तसेच आपत्कालीन मदत वाहन देखील असते. मात्र कंत्राटावरून जूपलेल्या भांडणात रस्त्यावर ना रुग्णवाहिका आहे ना आपत्कालीन वाहन.
त्यामुळे अपघात घडल्यावर वेळेत मदत पोहोचत नाही. संभाव्य अपघात ठिकाणी रिफ्लेक्टर्स नाहीत. त्यामुळे रात्रीची वेळ म्हटली की महामार्गावर प्रवाशांना जीव मुठीत धरावा लागतो.
पांगरी गावात सर्वाधिक अपघात क्षेत्र...
पांगरी गावात उड्डाणपुलाचे व महामार्गाचे काम अर्धवट आहे. सर्विस रोडवरच लोकांची अतिक्रमणे असल्यामुळे ही सर्व ठिकाणी ब्लॅक स्पॉट बनली आहेत. मात्र न्हाई प्रशासनाकडून संबंधितांना अभय देण्यात आले असल्याची चर्चा आहे.
महामार्गावरील नव्या व जुन्या अतिक्रमणांकडे देखील नाही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वावी येथील बसस्थानकात शिवशाही बस येऊ शकत नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागते.
मनुष्यवधाचा गुन्हा का नको ?
"वर्षभरापूर्वी पाथरे जवळ झालेल्या बस अपघातास कारणीभूत ठरवत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी मोंटेकार्लो कंपनीच्या व्यवस्थापना विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी वल्लेवाडी येथील तरुणाचा अपघातात बळी गेला आहे. पांगरी गावात झालेला हा अपघात न्हाई प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच घडला होता. त्यामुळे तरुणाच्या मृत्यूप्रकरणी न्हाईचे प्रकल्प व्यवस्थापक व मोंटेकार्लो कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या संदर्भात वावी पोलीस ठाण्यात मृताचे नातेवाईक व मित्रपरिवाराच्यावतीने तक्रार केली जाणार आहे. गुन्हा दाखल दाखल न झाल्यास आंदोलन करण्यात येईल."
- गणेश वेलजाळी (सामाजिक कार्यकर्ता, वावी)
झाडांनी सोडला जीव....
महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या मोंटे कार्लो कंपनीकडे पुढील सात वर्षांसाठी महामार्गाच्या दुतर्फा तसेच डिव्हायडर मध्ये लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी कंत्राटदार नेमलेला आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या झाडांची कुठलीही निगा राखली गेलेली नाही.
तसेच पाणी देखील घालण्यात आले नाही. त्यामुळे झाडांनी जीव सोडायला सुरुवात केली आहे. असे असले तरी गेल्या तीन महिन्यांपासून मात्र इमाने इतबारे संबंधितांना पाणी टँकर आणि झाडांच्या देखभालीचे पैसे आता करण्यात आल्याचे समजते. ही रक्कम काही लाखांच्या घरात आहे.
"शिर्डी महामार्गावरील संभाव्य ब्लॅक स्पॉट्स व इतर बाबींकडे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बंद असलेले आपत्कालीन मदत वाहन पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि ठेकेदार यांच्यात मतभेद असल्यामुळे काही प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत."- भाऊसाहेब साळुंके (प्रकल्प संचालक, न्हाई)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.