विश्वगुरू नेमकं कोण...?
विचारवंतांचे विचार ऐकण्यासाठी लोक आजही गर्दी करतात. मात्र त्यांचे विचार संपूर्ण ऐकून झाल्यावर स्वतःचे विचारदेखील लगेच बोलून दाखवतात.
असेच काहीसे घडले, शहरातील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात...भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, अंजू पंकज या ज्येष्ठ पत्रकारांचा ‘विश्वगुरू भारत’ हा परिसंवाद एका संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता.
मात्र या परिसंवांदात वक्त्यांनी मोदींचे इतके कौतुक केले, की बाहेर पडताना काही श्रोते चर्चा करत म्हणाले, ‘मला तर हा परिसंवाद ऐकून असं वाटतंय, की आपला देश जर मोदींमुळे विश्वगुरू होत आहे, तर खरे विश्वगुरू मोदीच झाले नाही का?’ (SAKAL Special chalta bolta comedy tragedy satire nashik)
आधी आदेश येऊ द्या, मग सत्कार करा!
निवड, नियुक्ती झाल्यानंतर सत्कार करण्याची सध्या फॅशन झाली आहे. सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा वर्षावच होतो. हल्ली राजकीय असो की शासकीय... सर्वच क्षेत्रात वाढदिवस, सत्काराचे फॅड जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर एकाने शुभेच्छा देण्यास सुरवात केली, की लागलीच घाई करत हौशींकडून शुभेच्छांचा पाऊस पडतो.
अनेकदा वाढदिवस नसतानाही शुभेच्छा देऊन ही हौशी मंडळी मोकळे होतात. मिनी मंत्रालयात असाच जिल्हा परिषद सरकारी व कर्मचारी बॅंकेच्या संचालकाचा वाढदिवस साजरा झाला. अगदी केक कापत, फुलांचा गुच्छ देत तरुण संचालक मंडळाने जोरदार फोटोसेशनही केले.
तेथे उपस्थित एका महिला संचालकाची विभागांतर्गत पदोन्नती होणार आहे, अद्याप त्यांचे आदेश आलेल नाहीत. मात्र, वाढदिवसाला उपस्थित हौशींकडून संबंधित पदोन्नती होणाऱ्या त्या महिला संचालकांचा सत्कार करण्याची घाई केली.
मॅडम... चला तुमची पदोन्नती झाली. मॅडमचाही सत्कार उरकून घ्या, असे काहींनी सांगितले. मात्र, पदोन्नतीधारक संचालिकांनी अद्याप आदेश आलेले नाहीत, घाई नको, आदेश मिळाल्यानंतर सत्कार करा, असा सबुरीचा सल्ला दिला.
नावच लिहिता येत नाही, पेपर कसा लिहू?
शाळेची पायरी चढायच्या आतच कोरोना आला. पहिले दोन वर्षे मास्क घालण्यात आणि ऑनलाइन शिक्षणातच गेले. त्यामुळे थेट तिसरीला पोचल्यावर वर्गात प्रवेश झाला. पण ऑनलाइन शिक्षणामुळे स्वत:चे नावही विद्यार्थ्यांना लिहिणे शक्य झाले नाही.
असे करत करत एक विद्यार्थी पाचवीपर्यंत पोचला. पण त्याला काही येईना. शेवटी त्याच्या आई-वडिलांनी त्याला होस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. या मुलाची मातृभाषा अहिराणी. शाळेत कुणीच अहिराणी बोलणारे नाही.
अशा परिस्थितीत पहिला पेपर सुरू होतो. पण या बहाद्दराने स्वत:चे नावही लिहिले नाही. हे शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्याकडे विचारणा केली, त्यावर तो म्हणतो, ‘‘सर मला नावच लिहिता येत नाही, पेपर कसा लिहू?’’ यावर शिक्षकांची बोलतीच बंद झाली.
अघोरी उपायांचा असाही करिश्मा
आरोग्याच्या दृष्टीने एखादी गोष्ट अंगलट आली, की नियमित उपायांपेक्षा अघोरी उपाय योजले जातात. या उपायांसंदर्भात दोन गोष्टी होतात. एक तर चांगली किंवा दुसरी वाईट. एका प्रकारात चांगल्या गोष्टीचा अनुभव एकाला आला.
त्याचे झाले असे : एकजण काही वर्षांपूर्वी पावसात कुटुंबासह इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर पाय घसरून पडला; परंतु पडल्यावर त्या वेळी काही त्रास झाला नाही. कालांतराने उजवा खांदा व मांडीचा भाग कायमचा दुखू लागला.
अनेक उपाय केले. अगदी महिनाभरासाठी फिजिओथेरेपिस्टकडे नियमित जाणे झाले; परंतु दुखरी बाजू काही बंद झाली नाही.
रोजच्या दुखण्यामुळे हैराण झाल्याने या बहाद्दराने ज्या जागेवर पाय घसरून पडला, त्याच जागेवर न दुखणाऱ्या बाजूने पडण्याचा प्रयत्न केला. अगदी जशेच्या तसे पडणे झाले नाही; परंतु दुखरी बाजू पूर्णपणे बरी झाली; तर दुसरी बाजू दुखण्यास सुरवात झाली. आता बोला!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.