"शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करा" - संजय राऊत

SanjayRaut4.jpg
SanjayRaut4.jpg

नाशिक : ज्या दिवशी सूडबुद्धीने केंद्र सरकारने देशाचे नेते शरद पवार यांना "ईडी'मार्फत चौकशीची नोटीस पाठविली, त्याच वेळी संतापाची ठिणगी पडून राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचा पॅटर्न देशाला दिशा देणारा असून, गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्‍वास व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी, प्रत्येक मराठी माणसाने पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

"मी पुन्हा येईन,' असे न सांगता परत येईन
 ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (ता. 25) झालेल्या "आमने-सामने' या मुलाखतीवेळी खासदार राऊत बोलत होते. राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. खासदार राऊत म्हणाले, की शरद पवार हे देशाचे नेते असून, अडल्या-नडल्यांचा संकटकालीन मार्ग आहेत. अडचणींवर ते स्वत: मार्ग काढतात. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता पवार म्हणजे दिल्लीत लढणारा शेवटचा मावळा आहेत. अनेकांना आता पवार यांची महानता समजायला लागली. दिल्लीत मंत्र्यांना कोणी ओळखत नाही. मात्र, शरद पवार यांना ओळखतात, हे त्यांचे कर्तृत्व असून, त्यातूनच परिवर्तनाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे. त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस बसावा या स्वप्नाच्या पूर्तीसाठी महाराष्ट्राने त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. महाविकास आघाडी पूर्णकाळ टिकेल. "मी पुन्हा येईन,' असे न सांगता परत येईन या शब्दात त्यांनी विश्‍वास व्यक्त केला. प्रतिष्ठानचे अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक केले. कृषिमंत्री दादा भुसे या वेळी उपस्थित होते. 
 


झुंडशाहीचे परिणाम दिसतील 
गेल्या पाच वर्षांत सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्याची भावना भाजपच्या पोटात गेल्याने वेडेवाकडे उद्योग झाले. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन पडद्यामागे वेगळेच उद्योग सरकारने केले. पक्षात व राजकारणात विरोधक ठेवायचाच नाही, अशा टोळी पद्धतीने सरकारी यंत्रणा वापरून राज्य चालविले. मंत्रालय लोकांसाठी असते, षडयंत्र करण्याचा अड्डा नाही. विरोधक संपविण्याची देशाची परंपरा नाही. हा संताप लोकांमध्ये होता. त्यामुळे फडणवीस यांना विरोधी पक्षनेते बनवून काळाने त्यांच्यावर घेतलेला सूड आहे. या झुंडशाहीचे परिणाम आणखी पुढे दिसतील. 

हेही वाचा > अमित ठाकरे यांचे खरे 'लॉंचिंग' नाशिकमध्येच!
संजय राऊत म्हणाले..! 
* केंद्र सरकार देशात विष पेरत आहे. 
* महाविकास आघाडीचे पवार शिल्पकार 
* महाविकास आघाडीचा आत्मविश्‍वास मला व पवारांना होता. 
* सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत भाजपने आत्मविश्‍वास गमावला होता. 
* कॉंग्रेसला तर सत्तेत येऊ असे स्वप्नही पडले नसेल. 
* ट्‌विटरवरील शायरीतून देशासमोर राज्याचे राजकारण आणले. 
* मी मनाने कधीही भाजपजवळ गेलो नाही. 
* शिवसेनेची व पक्षप्रमुखांची अप्रतिष्ठा होऊ नये ही माझी भूमिका. 
* ऍक्‍सिडेंटल शपथग्रहणावेळी राज्यपाल व राजभवन झोपले नाही. 
* अजित पवार परत येतील याची खात्री. 
* फडणवीसांच्या शपथविधीच्या घटनेमागे शरद पवार यांचा हात ही बदनामी. 
* आमदार फोडण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. 
* केंद्र सरकारने लोकांना असहिष्णू बनविल्याने टीका करणे अवघड. 
* महाराष्ट्र हातातून जाणे भाजपसाठी मोठा धक्का. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com