Nashik News : बळीराजाला ऐन हंगामात MSEDCLचा वीजतोडणीचा शॉक!; पाणी असूनही शेतकरी अडचणीत

Farmers In Trouble due to MSEDCL
Farmers In Trouble due to MSEDCLesakal

येवला (जि. नाशिक) : वीज आहे तर पाणी नाही, कधी पाणी आहे तर निसर्ग साथ देत नाही अन पाणी आहे, निसर्गही साथ देतो पण महावितरण तोंडात घास जाऊ देत नाही अशी काहीशी परिस्थिती येवला तालुक्यातील शेतकऱ्याची झाली आहे. सध्या लाल व रांगड्या कांद्यासह रब्बी हंगामातील पिके जोमात असून जलस्रोतांना पुरेसे पाणी आहे. मात्र थकीत आकडे वाढत चालल्याने महावितरणने बिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा, छोट्या डीपी काढण्याचा धडाका लावला असून तालुक्यात ६२ वर रोहित्र बंद केले आहे. किमान थकलेले दोन बिले भरावेत असे आवाहन महावितरण करत आहे. (Shock of MSEDCL power cut to Farmers in trouble despite water Nashik Latest Marathi News)

दुष्काळी असलेल्या तालुक्यातील शेती आठमाही आहे. त्यामुळे खरीप व रब्बीवर तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे गणित अवलंबून असते. त्यातच उत्तर पूर्व भागात तर फक्त नोव्हेंबर ते जानेवारी या काळातच विहिरींचे पाणी पिकांना देण्याची गरज पडते. बाकी आठ ते दहा महिने वीज पंप बंदच असतात. तरीही महावितरण वर्षभराची वीज बिल आकारणी करत असल्याने आम्ही बिले कशी भरावी हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विजेची गरज असतानाच महावितरण वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत आहे.

बील वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याची व व्यक्तीगत असणार्‍या छोट्या डीपी काढून नेण्याची मोहीम महावितरणने हाती घेतल्याने ऐन हंगामात शेतकरी अडचणीत सापडला आहे. महावितरणने तालुक्यातील ६७ गावातील ६२ रोहित्र बंद करण्यात आले आहे. याबरोबरच व्यक्तीगत असणाऱ्या सिंगल डीपी देखील वीजबील वसुलीसाठी बंद करण्यात येत असून बिल न भरल्यास या डीपी देखील काढून नेण्यात येत आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटाने गेल्या काही वर्षात शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना आता नवे संकट उभे राहिले आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Farmers In Trouble due to MSEDCL
Nashik Lumpy Update: ‘लम्पी’ने येवल्यातील शेतकऱ्याची वाढविली चिंता; तालुक्यात 8 जनावरे बाधित

तालुक्यात १२८ कोटी रुपये थकले

तालुक्यात १८ हजार ९९१ वीज ग्राहक असून या ग्राहकांकडे १२८ कोटी ६९ लाख ६५ हजार रुपये थकबाकी आहे.कृषी धोरण २०२० योजने अंर्तगत मार्च २०२३ पर्यंत शेतकऱ्यांनी थकीत वीजबील भरल्यास ३० टक्के सूट दिली जात असल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे.थकबाकी वाढल्याने वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करणे सुरू आहे.

"जिल्ह्यातील बळीराजाचा वीजपुरवठा शासनाने तोंडी आदेश करून बंद करण्याचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधू अतिवृष्टीमुळे त्रस्त असून खरिपाची पिके जवळपास हातचे गेलेले असताना देखील रब्बीची पिके उभे करण्यासाठी धडपड करत आहे. यातच रोहित्र बंद करून वीजपुरवठा बंदचे हत्यार उगारून बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे."

- मकरंद सोनवणे, माजी सभापती, कृउबा, येवला

"शेतकऱ्‍यांनी थकीत वीजबील भरून महावितरणला सहकार्य करावे. शासनाच्या कृषी धोरण योजनेचा लाभ घेवून वीज बील थकबाकी भरावी. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना ३० टक्के सुट मिळणार आहे. नियमीत वीज बील भरणा केल्यास वीज खंडीत करण्याची कटू कारवाई करण्याची वेळ येणार नाही. आता दोन बिले भरणारे रोहित्र सुरू केले जात आहे."

- मिलींद जाधव, उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण)

"शेतकरी आत्ता कुठे संकटातून सावरत रब्बीच्या तयारीत असताना महावितरणने थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांची वीज कापण्याची मोहीम हाती घेतलीय. शासनाचा हा तूघलकी निर्णय असून वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरू." - हरिभाऊ महाजन, तालुका अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना

Farmers In Trouble due to MSEDCL
Nashik Crime News : त्र्यंबकेश्‍वरला भाविक महिलांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com