उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागण्याची शक्यता...कारण..

ranvad sakhar karkhana.jpg
ranvad sakhar karkhana.jpg

नाशिक : (निफाड) अवघ्या दोन महिन्यांवर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश कारखाने सोडले तर बाकी सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागणार असल्याने यंदा तरी रानवड कारखान्याचे धुराडे पेटणार का, असा सवाल पडला आहे.

रासाका कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात
 
या वर्षाच्या सुरवातीला निसाका, रासाका सुरू होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन् निवडणुकीपूर्वी दिलेले निसाका, रासाका सुरू करण्याचे आश्वासन कारणीभूत ठरले आहे. मात्र एवढे होऊनही कारखाना सुरू होण्याबाबत ठोस भूमिका न झाल्याने रासाका कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात पोचली आहे. 
यातच ऊसतोड करण्यासाठी कामगारांबरोबर ऊस उत्पादकांना करावी लागणारी तडजोड या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहिला आहे. 

पुन्हा एकदा साकडे 

यातच सत्तापालट झालेला असल्याने कारखान्याचे धुराडे पेटविण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यातूनच निफाड तालुक्याच्या नेत्यांनी बैठक घेत कारखाने सुरू करण्यासाठी एकजूट दाखविली. मात्र हंगाम समोर येऊन ठेपला असल्याने नाही निसाका निदान रासकाचे धुराडे यंदा तरी पेटावे, असे शासनदरबारी रासाका कृती समितीने निवेदन दिले आहे. यासह साखर आयुक्तांची भेट घेत रासाका सुरू करण्यासाठी साकडे घातले आहे. 

रानवड सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा म्हणून आम्ही अनेकदा आंदोलने केली. साखर आयुक्तांच्या दरबारात ठाण मांडले; परंतु कारखाना सुरू होऊ शकला नाही. आता महाविकास आघाडी सरकारने कारखान्याचे धुराडे पेटवून कामगार सभासद आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. - हंसराज वडघुले, शेतकरी नेते 

ऊस शिल्लक असताना यंदाचा साडेपाच हजार हेक्टर ऊस गाळपासाठी आहे. अशातच जिल्हाभरातील कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची कोंडी झाली आहे म्हणून निफाड तालुक्यातील कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. - धोंडिराम रायते, अध्यक्ष, निसाका संघर्ष समिती 

निसाका, रासाका सुरू व्हावेत म्हणून तालुक्यातील आजी-माजी नेते एकत्र आले. मात्र अद्यापही ठोस कार्यवाही नाही. आता कृती समितीच्या माध्यमातून याविरोधात रान पेटविणार आहोत. यंदाच्या हंगामात कुठल्याही परिस्थितीत कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. - वैभव कापसे, रासाका कृती समिती 

कारखाना बंद असल्याने आमची रोजीरोटी थांबली आहे. या कारखान्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली तरी मायबाप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा कारखाना सुरू करावा. - काशीनाथ वाघ, रासाका कामगार 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com