तेजलने 12 वीच्या परीक्षेत मिळवला प्रथम येण्याचा बहुमान

Tejal Success story
Tejal Success storyesakal

नामपूर ( जि नाशिक ) : 'हॅलो, तेजल बेटा! तुझा बारावीच्या परीक्षेत नामपूर महाविद्यालयात प्रथम क्रमांक आला आहे.' असे गणेश काकांचे शब्द कानावर पडल्यावर मनापासून आनंद तर झाला....! परंतु माझं यश बघायला माझे पप्पा असायला हवे होते, अशी भावना व्यक्त करीत तेजल खरोटेने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. भविष्यात जिद्दीने शिकून अधिकारी होण्याची तिची इच्छा आहे.

महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तेजल मयूर खरोटे हिने बारावीच्या परीक्षेत ८३.३३ टक्के गुण मिळवून तीनही शाखेत प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे. दुर्दैवाने दोन महिन्यांपूर्वी तेजलचे वडील युवा शेतकरी मयूर खरोटे यांनी शेतमालाचे घसरलेले भाव, विमा कंपनीकडून होणारी फसवणूक, अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाचे झालेले नुकसान आदी बाबींना कंटाळून विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली होती.

त्यामुळे बारावीचा निकाल लागल्यानंतर आपल्या वडिलांच्या आठवणींनी तेजलचे मन गहिवरून आलं. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपले काका सामाजिक कार्यकर्ते गणेश खरोटे यांनी मोबाईलद्वारा निकालाची माहिती दिली. वडिलांच्या निधनानंतर आमचे आजोबा विनायक खरोटे, काका गणेश खरोटे यांनी आम्हाला मोठा आधार दिल्याचे तेजलने सकाळला सांगितले. मयत मयूर खरोटे यांच्यामागे वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

तेजल लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्याने विद्यालयात पहिल्या तीन क्रमांकातच तिची वर्णी लागत असे. वडिलांचे दुःख कवटाळत बसण्यापेक्षा अभ्यासाकडे तिने आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतर तेजलने धाडसीवृत्तीने आपल्या आईला, लहान भावाला धीर देवून अनोखा सामाजिक संदेश दिला आहे.

Tejal Success story
कोरोनामुळे पतीचे निधन, तरी ‘ती’ने मिळविले यश

तिच्या यशाबद्दल सहकारमहर्षी जयवंतराव सावंत ग्रुप, मोसम प्रतिष्ठान, श्रीहरी प्रतिष्ठानच्या वतीने स्मृतीचिन्ह, भेटवस्तू देवून तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेसी गटाचे नेते विलास सावंत, नामपूर बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत, ज्येष्ठ पत्रकार शरद नेरकर, मुख्याध्यापिका स्नेहलता नेरकर, माजी सरपंच पुष्पा मुथा, नामपूर सहकारी सोसायटीचे संचालक एकनाथ मोराणे, सुनिल अलई, अशोक पवार, उत्तम सावंत, जगदिश सावंत, दिपक सावंत, नकुल सावंत, राजेंद्र सावंत, सचिन सावंत, त्र्यंबक सोनवणे, प्रविण सावंत, माजी सरपंच प्रमोद सावंत, मुंबई पोलीस विनोद शिरापुरी, कांदा व्यापारी सचिन मुथा, मनींद्र सावंत, सुनील निकुंभ, पंकज वाघ, तारिक शेख, राजू पंचाळ, समाधान देवरे, निलेश सावंत, कैलास चौधरी, आदी यावेळी उपस्थित होते.

"भारत कृषिप्रधान देश असला तरी अनेक संकटांच्या मालिकांमुळे शेती व्यवसायाचे धोके वाढले आहेत. विमा कंपन्याकडून होणारी लूट, पिकांना हमीभाव नसणे, शेतीव्यवसायाबाबत शासनाचे उदासीन धोरण यामुळे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळला गेला आहे. शेती व्यवसायाला सुगीचे दिवस येणे गरजेचे आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे शेतीला वाईट दिवस असल्याने माझे पप्पा आम्हाला सोडून गेले. माझं यश पाहण्यासाठी पप्पा असायला हवे होते."

-तेजल खरोटे, नामपूर

Tejal Success story
नियतीवर मात करत उभ्या राहिल्या खिराडच्या भारती गावित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com