इगतपुरी शहर : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या पहिली ते दहावीच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये उद्यापासून (ता.२१) खऱ्या अर्थाने गजबजणार आहेत. कोविडचे संकट कमी झाल्याने सोमवार (ता.२२) पहिली ते दहावीच्या सर्व शाळा पुन्हा सुरू होणार आहे. शाळांना काही मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. परंतू कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांची कोरोना चाचणची सक्ती करू नये, केवळ पालकांच्या संमतीपत्रावरून शाळाप्रवेश देण्यात यावा असे बजावले आहे.
काही शाळा मनमानी पद्धतीने मुलांना रॅपीड अॅन्टीजेन टेस्टची सक्ती करत असून ती केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे संदेश पाठवत असल्याचे आज स्पष्ट झाले. शासनाकडून असे कोणतेही आदेश नसल्याने कोणत्याही शाळेला याबाबत सक्ती करता येणार नसल्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले. शासनाच्या आदेशानुसार सोमवार (ता.२२) पासून शाळेचे द्वितीय सत्र सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळांकडून पालकांना विविध सूचना करणारे संदेश पाठविले जात आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचना डावलून अनेक नवीन सूचना परस्पर विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट करावी व त्याचा रिपोर्ट पहिल्या दिवशी शाळेत द्यावा. एक डिसेंबरपासून बस व्यवस्था सुरू होईल परंतू त्याआधी पुढील सत्राची संपूर्ण फी भरावी, इतर फी सुद्धा तात्काळ जमा करावी. या अशा अनेक सूचनांमुळे पालकांना मोठा मनस्ताप होत आहे.
सक्ती केल्यास कारवाई : कासुळे
कोविड अॅन्टीजन टेस्टबाबत शासनाने कोणतेही आदेश दिलेले नसताना शाळांनी परस्पर तसा फतवा काढून पालकांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. शाळांची ही मनमानी पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शाळांना अशा प्रकारे विद्यार्थ्यावर कुठलीही सक्ती करता येणार नाही किंवा तसे केल्याचे आढळल्यास अशा शाळांवर कारवाई केली जाईल. सर्वच शिक्षकांचे लसीचे दोन ढोस आवश्यक असल्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.