पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ‘जिंदो को मिले ना अस्पताल, ना मिल रहा मुर्दो को शमशान, कोरोना तो थम नहीं रहा, अब तू ही थम जा इन्सान...’ या काव्यपंक्तीचा प्रत्यय सध्या निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात येत आहे. अंतिम सत्य असलं तरी मृत्यूची भीती प्रत्येकालाच असते. परंतु, कोरोना महामाहारीमुळे आप्तस्वकीयांचा होत असलेला मृत्यू फारच वेदनादायी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाच्या निमित्ताने रुग्णांचे होणारे हालही यापुढे आले आहेत.
ही प्लेगची झलक आहे काय?
पिंपळगाव बसवंत शहरासह साकोरे मिग, कोकणगाव, उंबरखेड, पालखेड, कारसूळ, शिरवाडे वणी, आहेरगावसह परिसरातील पंचवीस गावांतील ग्रामस्थांनी गाव सोडून शेतात संसार थाटला आहे. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या प्लेग रोगाच्या साथीत झालेल्या स्थलांतरानंतर गावे ओस पडली होती. त्याची ही झलक आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. रानावनात स्थलांतरित झालेले लोक सांगतात, की आम्हाला येथेही काट्याकुट्या, साप, विंचू यांच्या दंशाची भीती आहे. पण, त्यावर उपचार होऊ शकतो. कोरोना झाला, तर घाबरूनच प्राण जातील, अशी भीती असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
गर्दीमुळे कोरोनाने पसरले पाय…
निफाड तालुक्यातील गावांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. पण, नंतर गावागावांमध्ये लग्नसोहळे, अंत्यविधी, दशक्रिया विधीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नियमांची पायमल्ली झाल्याने कोरोनाने ग्रामीण भागात जोरदार दस्तक दिली आहे. मृत्यूचे थैमान सुरू आहे. तालुक्यात रोज किमान दहा जणांचा मृत्यू होत असल्याने ग्रामस्थ घाबरले आहेत. त्यामुळे गावातील कुटुंब शेतात स्थलांतरित होत आहे. गर्दीशी संपर्क टाळण्यासाठी शेतात निवाऱ्याची व्यवस्था करून त्यांनी कोरोनापासून सुरक्षित ठिकाण शोधले आहे.
गाव ओसाड अन् शेतीशिवार गजबजले!
कोरोना झाला, तर शासकीय दवाखान्यात ऑक्सिजनचे बेड नाही. खासगी उपचार घ्यायला परवडत नाही. त्यामुळे सध्या शेतातच तात्पुरती झोपडी बांधून संसार मांडल्याचे ग्रामस्थ सांगतात. कोरोनाने हाहाकार उडवून दिल्यानंतर १० ते १५ दिवसांपासून हे स्थलांतर सुरू आहे. गावागावांत कोरोनाचा स्फोट झाला असून, येणारा संपर्क टाळण्यासाठी भीतीने हे पाऊल उचलले आहे. दिवसभर शेतात काम करायचे तेथेच चटणी-भाकर खाऊन दिवस काढायचे, अशी मानसिकता शेतकरी कुटुंबाची झाली आहे. शिवाय कायमस्वरूपी शेतात घर, बंगला बांधून राहणाऱ्या द्राक्षबागाईतदार शेतकऱ्यांनी गावाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे रोज सकाळी चावडी, ग्रामपंचायत, सोसायटी ते सभागृह, पारावरील जमणारे नागरिक येत नसल्याने गाव सुनेसुने आहे. गाव ओसाड अन् शेतीशिवार गजबजलेली अशी स्थिती सध्या आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.