सेकंड मेन
--
आशा सेविकांना मिळणार विम्याचे कवच
हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा ः २१ हजारांपेक्षा कमी वेतन असलेल्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. २६ : राज्यातील आशा स्वयंसेविका तसेच २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी (एनएचएम) कर्मचाऱ्यांना आगामी काळात विम्याचे कवच मिळणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलली आहेत. शासनाच्या कल्याणकारी निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचारी व कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ मिळणार असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
--
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसेच पतसंस्था कर्मचारी, रेशन दुकानातील कामगार, खाजगी शाळांचे कर्मचारी, स्वयंरोजगार संस्था तसेच वाचनालयातील कर्मचारी अशा २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या घटकांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्मचाऱ्यांसाठी राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्याचे आशा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
राज्यात सुमारे ८४ हजार आशा सेविका कार्यरत असून, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना व उपक्रम सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आशा सेविकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, व आपत्कालीन वैद्यकीय सेवा (१०८/१०२) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे देखील आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात योगदान असते. या कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपातील नियुक्तीमुळे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाहीत. अशा सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षितता देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेच्या कक्षेत आणण्याबाबत आरोग्य मंत्रालय सकारात्मक आहे.
राज्यातील नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन, स्वयंरोजगार संस्था, रेशन दुकान कर्मचारी संघटना, सार्वजनिक वाचनालयातील कर्मचारी तसेच खासगी शैक्षणिक संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून राज्य कामगार विमा योजनेत सहभागी करून घेण्याची मागणी आहे. अशा प्रकारचे काम करणाऱ्या व अल्पउत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांवरील वैद्यकीय खर्चाचा भार कमी करण्यासाठी तसेच अपघात, गंभीर आजार आणि मातृत्वाच्या काळात आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी ईएसआयएस योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याबाबत आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
---
कोट
राज्यातील आशा सेविकांना विमा कवच देण्याचा शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे. राज्यातील हजारो आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. आशा सेविकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाकडून न्याय मिळावा.
- सुरेखा खैरनार, जिल्हाध्यक्ष आशा सेविका संघटना, नामपूर
---