ॲंकर
(एआय चित्र वापरावे)
---
आरोग्य यंत्रणेचे यंदा ‘अतिसार थांबवा’ अभियान
(उपशीर्षक)
ओआरएस पावडर, झिंक गोळ्यांसह औषधी वाटप; जनजागृतीवर भर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : पावसाळ्यात दूषित पाणी पिण्यातून किंवा अन्य कारणातून अतिसाराच्या घटना होत असतात. याला आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ‘अतिसार थांबवा’ अभियान हाती घेतले आहे. यात पाच वर्षांखालील बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाने जनजागृती, घरभेटी तसेच मोफत औषध वितरणाची मोहीम राबविण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात अनेकदा दूषित पाणीपुरवठा होत असतो. हे पाणी पिण्यात आल्यास त्रास जाणवत असतो. शिवाय अस्वच्छता देखील साथीचे आजार पसरण्यास कारणीभूत ठरत असतात. यात बऱ्याचदा अतिसाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे प्रकार देखील जिल्ह्यात दरवर्षी होत असतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून, यंदा ‘अतिसार थांबवा’ अभियान राबविले जात आहे.
घराघरांत सर्वेक्षण
अभियानात ३ हजार २८४ आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून घराघरांत जाऊन पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बालकांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळल्यास तातडीने ओआरएस पावडर आणि झिंक गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार अभियानांतर्गत ४ लाख ५३ हजार ८०५ ओआरएस पावडर आणि ९ लाख ४० हजार ४९० झिंक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
चौकट
आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस-झिंक कॉर्नर
ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविणारे ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये विशेष ‘ओआरएस-झिंक कॉर्नर’ सुरू करण्यात येत आहेत. या ठिकाणी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार असून अतिसारग्रस्त बालकांना तातडीने उपचार आणि औषधे देण्याची व्यवस्था येथे असेल. तसेच उपचारासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दृष्टिक्षेपात अभियान...
- अतिसारातून बालमृत्यू रोखण्याचा प्रयत्न.
- ३,२८४ आशा स्वयंसेविकांकडून सर्वेक्षण.
- ४ लाख ५३ हजार ८०५ ओआरएस पावडरचे वाटप.
- ९ लाख ४० हजार ४९० झिंक गोळ्यांचे वाटप.