
नाशिक : नात पाड्याला रस्ता नसल्याने आड मार्गाने शाळेत जात होती. नदी ओलांडताना ती पडली. वाहून जात असताना ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले. नाशिकच्या सरकारी दवाखान्यात नेले. ती वाचली. मोठा खर्च झाला. पण कुणीही मदत केली नाही...ऐंशी वर्षाच्या लहानीबाई गोभाले यांची ही व्यथा. उंबरमाळ (ता. पेठ) या पाड्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव धूमधडाक्यात साजरा होत असताना रस्ता नाही. बांध, दरी-कपाऱ्यातून इथल्या रुग्णांना डोलीतून न्यावे लागते. दिवाळीपासून अंधार आहे. डीपी जळाल्याची तक्रार देऊनही वीज कर्मचारी-अधिकारी फिरकले नसल्याची खंत इथले आदिवासी व्यक्त करतात.
उंबरमाळ हा पाडा पिंपळवटी ग्रामपंचायतचा आहे. पिंपळवटी ग्रामपंचायतीतंर्गत करंजपाडा, उंबरमाळ, घोट विहीर, घोसाळीचा समावेश होतो. उंबरमाळ हा तीस घरांचा अन दीडशे लोकसंख्येचा पाडा. इथून वाहणाऱ्या रास नदीच्या किनाऱ्याने मुख्य रस्त्यावर तीन किलोमीटर जावे लागते. शेताचा बांध हाच आदिवासी बांधवांचा रस्ता आहे. लसीकरणासाठी दुसऱ्या पाड्यावर जावे लागले. धान्य आणण्यासाठी घोट विहीर पाड्यावर जावे लागते. इथे जाण्यासाठी भलामोठा डोंगर चढून जावे लागते. इथल्या जंगलात महिलांना अनेकवेळा बिबट्याचे दर्शन झाले. पाड्यावर वाहन येत नसल्याने लाकडाच्या बल्ल्यांमध्ये चादर बांधून डोली करत तिच्यातून रुग्णांना दवाखान्यात न्यावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे आदिवासी बांधव सांगतात.
पावसाळ्यात तुटतो संपर्क
पावसाळ्यात उंबरमाळचा संपर्क तुटतो. चारही बाजूने डोंगर आणि नदीमुळे पूर मोठा येतो. त्यामुळे पाड्याबाहेर जाता येत नाही. अशावेळी रुग्णाला उपचार मिळत नाहीत. या पाड्याच्या बाजूला असणाऱ्या करंजपाडा पाड्याची अवस्था अशीच आहे. रस्ता ग्रामस्थांनी तयार केला आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्ता वाहून जातो. इथल्या रुग्णांना सुद्धा डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. या पाड्यावर प्राथमिक शाळा आहे. पावसाळ्यात पूर आल्यावर शाळेला सुटी दिली जाते. या दोन्ही पाड्यावर अनेक वर्षांपासून अधिकारी-लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याचे स्थानिक आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने आमच्या भागाचा संपर्क तुटतो. त्यामुळे रुग्णाला दवाखान्यात नेता येत नाही. माझ्या घरातील तीन व्यक्तींचा एका महिन्यात वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. मी स्वखर्चाने पाड्यावर येण्यासाठी रस्ता करतो. पण तो पावसाळ्यात वाहून जातो. एक रस्ता मिळावा इतकीच आमची मागणी आहे.
- जगन चौधरी, करंजपाडा
पाड्याला रस्ता मिळावा यासाठी अनेकदा निवेदन दिली. पण काहीही उपयोग झाला नाही. ‘गाव तेथे रस्ता’ ही सरकारी योजना फसवी वाटते. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. आमचे प्रश्न मार्गी लागले नाही, तर आम्ही मतदान करणार नाही आणि नेत्यांना गावात येऊ देणार नाही.
- यादव माळगावे, करंजपाडा
आदिवासी पाड्यावर दिवाळीपासून वीज नाही. पाड्यावर शाळा नाही. धान्य आणण्यासाठी दुसऱ्या पाड्यावर जावे लागते. आजपर्यंत गावात कोणताही अधिकारी फिरकलेला नाही. उंबरमाळ-करंजपाडा-पेठ रस्ता असा रस्ता व्हावा. मूलभूत सुविधा व्ह्याव्यात, अशी अपेक्षा आम्हा उपेक्षितांची आहे.
- मंगेश गोभाले, उंबरमाळपाडा
पावसाळ्यात आमच्या पाड्याचे दुःख कुणालाही दिसत नाही. आम्ही देखील माणसे आहोत, याचा तरी सरकारने विचार करावा.
- शांता वातास, उंबरमाळपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.