Water Crisis : कामाच्या दिरंगाईने नाशिकरोडकरांच्या घशाला कोरड! जलवाहिनीची क्षमता कारणीभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water crisis

Water Crisis : कामाच्या दिरंगाईने नाशिकरोडकरांच्या घशाला कोरड! जलवाहिनीची क्षमता कारणीभूत

नाशिक : उन्हाच्या चटक्यांची जाणीव होवू लागताच हंगामातील समस्यांनी तोंड वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यात सर्वात महत्त्वाच्या पाणी टंचाईचा पहिला फटका नाशिक रोड विभागाला बसत असून, या भागात ७२ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता असताना प्रत्यक्षात पन्नास दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे.

तब्बल २२ दशलक्ष लिटर कमी पाणीपुरवठा होत असल्याने नाशिकरोडवासीय पाणी टंचाईने बेजार झाले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याला धरणातील पाणीसाठा नव्हे तर कच्च्या पाण्याची जलवाहिनीची क्षमता कारणीभूत ठरली आहे. (Water Crisis at Nashik Road due to delay in work Due to capacity of aqueduct water supply nashik news)

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दारणा धरणातून दोनशे दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण दरवर्षी होते. दारणा धरणातील चेहेडी येथे महापालिकेने पंपिंग स्टेशन उभारले आहे.

चेहेडी पंपिंगवरून कच्चे पाणी उचलून नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रात शुध्द केले जाते. पुढे जलकुंभाच्या माध्यमातून घरोघरी पाणीपुरवठा होतो. परंतु चेहेडी पंपिंग येथून महापालिकेने पाणी उचलणे बंद केले आहे.

त्याला कारण म्हणजे कच्चे पाणी उपसताना प्रदूषणामुळे अळीयुक्त पाणी उपसले जाते. पाणी स्वच्छ करण्यासाठी लिक्विड क्लोरिनचा अधिक वापर करावा लागतो. त्यामुळे पाण्याला दर्प येतो. म्हणून दोन वर्षांपूर्वी नाशिक रोडच्या नगरसेवकांनी महासभेत राडा घातला होता.

तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिक रोडला गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा पासून नाशिक रोडला गांधीनगर केंद्रातून पाणीपुरवठा होतो. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात गंगापूर धरणातील पाणी घेतले जाते.

गांधीनगर ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जुनी पाइपलाइन आहे. त्याद्वारे फक्त ५० दशलक्ष लिटर पाणी वहन होते. परंतु, नाशिक रोडची गरज ७२ दशलक्ष लिटरची आहे. तब्बल २२ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

सदर बाब भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी निदर्शनास आणून देताना तातडीने नवीन पाइपलाइनचे काम सुरू करण्याची मागणी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे.

कामात शिथिलता, ठेकेदाराला नोटीस

गांधीनगर ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ५० दशलक्ष लिटर वहन क्षमतेची कच्चे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी आहे. त्याला समांतर २५ दशलक्ष लिटर वहन क्षमतेची नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे.

जवळपास अठरा कोटी रुपयांचे टेंडर काढून नऊ महिन्यांपूर्वी आडके नामक कंत्राटदाराला काम वर्कऑर्डरदेखील देण्यात आली आहे. परंतु अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराला नोटीस बजावली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

त्यानंतर मात्र पाइप खरेदीपर्यंत काम सरकले आहे. याचाच अर्थ काम पूर्ण होण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून, तोपर्यंत नाशिकरोडवासीयांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

"नाशिक रोड व जेल रोडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अमृत-२ योजनेत नवीन जलवाहिनीच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच मंजुरी मिळून कामाला सुरवात होईल. सध्या मंजूर काम तातडीने सुरु करण्यासाठी महापालिकेला सूचना दिल्या आहेत." - ॲड. राहुल ढिकले, आमदार.

"गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रापासून नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी मंजुरी मिळाली असून, संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देवून नऊ महिने उलटले तरी काम सुरु होत नाही. त्यामुळे नाशिक रोडला पाणी टंचाई असून काम सुरू न झाल्यास आंदोलन करू."

- संभाजी मोरुस्कर, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप.

"पाईपलाईनच्या कामासाठी नऊ महिन्यांपूर्वी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले. परंतु, अद्यापही काम सुरू न झाल्याने नोटीस बजावण्यात आली. ठेकेदाराकडून लवकरच काम सुरू करण्याचे
आश्वासन दिले आहे." - शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग