नाशिककरांचे हक्काचे 400 दशलक्ष घनफूट पाणी वाया

dam
damesakal

नाशिक : राज्याच्या विविध भागांत मुसळधारेने वित्त व जीवितहानी होत असताना नाशिकमध्ये मात्र धरणांच्या क्षेत्रात अपुरा पाऊस पडल्याने नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, यामागे ढिसाळ नियोजन असल्याची बाब समोर येत असून, अन्य विषयांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. चेहेडी बंधाऱ्याच्या वरील बाजूला नवीन भिंत बांधून तेथून पाणी उचलले असते, तर शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नसते व ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचा पुरेपूर वापर करणे शक्य झाले असते. (Water-shoratge-due-to-lack-of-planning-marathi-news-jpd93)

नियोजनाच्या अभावामुळे पाणीकपात

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे या धरणांतून पाणीपुरवठा होतो. या वर्षी ३१ जुलैअखेरपर्यंत गंगापूर धरणातून तीन हजार ८००, दारणा धरणातून ४००, तर मुकणे धरणातून दोन हजार ३०० दशलक्ष घनफूट असे एकूण पाच हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी शहरासाठी आरक्षित होते. गंगापूर धरणातून आरक्षित पाण्यापेक्षा अधिक पाणी उपसा करण्यात आला. मुकणे धरणातील आरक्षित पाण्याचा पुरेपूर वापर झाला. मात्र, दारणा धरणातील एकूण आरक्षित पाण्यापैकी १६.७१ दशलक्ष घनफूट एवढेच पाणी वर्षभरात वापरले गेले. उर्वरित ३८३.२९ दशलक्ष घनफूट आरक्षित पाणी वाया गेले आहे. डिसेंबरमध्ये दारणा धरणातून अळीयुक्त पाणीपुरवठा होऊ लागल्याने येथून पाणी उचलणे बंद करण्यात आले होते. त्याऐवजी गंगापूर व मुकणे धरणातून पाणी आणून पुढे गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिक रोड विभागाला पाणीपुरवठा केला गेला. त्यामुळे दारणा धरणातील ३८३ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण व्यपगत झाले. गंगापूर व मुकणे धरणातून नाशिक रोड विभागासाठी पाणी उचलले जात असल्याने या दोन्ही धरणांतील आरक्षित पाणी संपले व पर्यायाने नाशिककरांवर आठ दिवसांतून एकदा संपूर्ण दिवस पाणी बंद करण्याची वेळ आली. धरण परिसरात अद्यापही पाऊस सुरू असला, तरी समूह म्हणून ५० टक्क्यांच्या वर धरण भरले जात नाही, तोपर्यंत ही कपात कायम राहणार आहे.

हक्काचे आरक्षित पाणी वाया

पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, दिवाबत्ती, आरोग्य व रस्ते हे महापालिकेचे प्रमुख कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडत असताना अनेक अनावश्यक बाबींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र पाणीपुरवठ्यासारख्या विषयाकडे राज्य शासनावर अवलंबून राहावे लागते. २०१९ मध्ये तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक रोड भागाला स्वच्छ पाणीपुरवठा होण्याबरोबरच आरक्षित पाण्याचा १०० टक्के वापर करण्याच्या उद्देशाने दोन पर्यायांचा विचार केला. वालदेवी नदीतून चेहेडी पंपिंगकडे येणारे दूषित पाणी अन्य मार्गाने वळविण्याचा पहिला, तर वालदेवी-दारणा नदीच्या संगमावर पंपिंग स्टेशन नेण्याचा दुसरा पर्याय होता. या दोन्हींपैकी एक जरी पर्याय स्वीकारला असता, तरी शहराचे हक्काचे ४०० दशलक्ष घनफूट पाणी वाया गेले नसते. त्यामुळे शहराचे हक्काचे पाणी वाचविण्यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी अधिक आरक्षणाची गरज आहे. मात्र उपलब्ध आरक्षित पाण्याचा वापर होत नाही. महापालिकेने दारणा धरणातील आरक्षित पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. -ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व

dam
नाशिक : निफाड तालुक्यात नवा साथरोग आढळल्याने पशुपालक चिंतेत!

नाशिक रोड भागासाठी पिण्याचा स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. चेहेडी बंधाऱ्यातून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करू. चेहेडी पंपिंग स्टेशनवर नवीन भिंत बांधण्याचा प्रस्ताव योग्य आहे. -प्रशांत दिवे, प्रभाग सभापती, नाशिक रोड

dam
ग्राहकाच्या वादातून दोन भावांवर कोयत्याने वार; घटना कॅमेरात कैद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com