म्हसरूळ (जि. नाशिक) : बांधकामे करताना नैसर्गिक नाल्यांचा श्वास कोंडण्याचा प्रकार सर्रास सुरू असून, थेट नाल्यांवरच बांधकामे करून नाले नष्ट करण्यात येत आहेत. असे असताना रस्त्यांच्या कामावेळी नैसर्गिक नाल्यांसाठी रस्त्यांच्या खाली टाकलेले पाइप आणि दोन्ही बाजूला बांधकाम करून त्यावर रेलिंग लावण्यात आल्याने येथे नाला असल्याची खूण दर्शवित आहे. अशा मोऱ्या आणि त्याचे रेलिंग नष्ट करण्याचे प्रकारही सुरू असल्याचे औरंगाबाद रोडवर सध्या दिसत आहे. या प्रकारांनी नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवत आहे. याकडे महापालिका आयुक्त (NMC Commissioner) लक्ष देणार का, याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
औरंगाबाद रोडवर मानूर शिवार ते औरंगाबाद नाका या पाच किलोमीटरच्या परिसरात १३ नैसर्गिक नाले असून, त्यातील केवळ तीनच नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व टिकून आहे. त्यातील काही नाले तर पूर्णपणे बुजविण्यात आले आहेत, तर काही पूर्ण बुजविले जातील, असे चित्र दिसत आहे. औरंगाबाद रोडच्या रुंदीकरणावेळी येथील नैसर्गिक नाल्यातील पाणी रस्त्याखालून सहज वाहून जाईल, याची व्यवस्था करण्यात आली होती. जेथे- जेथे नाले आहेत, अशा ठिकाणी सिमेंटचे मोठे पाईप टाकून दोन्ही बाजूला बांधकामे केले आहेत. त्यावर रेलिंग लावले आहेत. त्यावरून येथून नैसर्गिक नाले वाहत होते, हे सहज लक्षात येते.
औरंगाबाद रोडच्या दोन्ही बाजूला अनेक बांधकामे झाली आहेत. रस्त्याच्याकडेला तर अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. ते करीत असताना, त्यांनी या नाल्यांवर घाला घातला आहे. नाल्यांचे प्रवाहच खंडित केले आहेत. केवळ या मोऱ्या आणि त्यावर असलेल्या रेलिंगमुळे त्यांचे अस्तित्व होते, हे लक्षात येत नाही तर या भागात नाले होते, असे एकही निशान शिल्लक राहिलेले नाही. आता तर मोऱ्यांवरील रेलिंग तोडण्याचे प्रकार घडत आहेत.
तपोवनाजवळील कुष्ठधामच्या समोरच्या भागातील नैसर्गिक नाल्याच्या रेलिंगचे पाईप तुटून ते बाजूला पडले आहेत. ते असेच पडून राहिले तर थोड्याच दिवसात ते गायबही होऊ शकतील. असे प्रकार इतर नाल्यांच्या ठिकाणी झाले आहेत. म्हसरूळ-आडगाव शिवाराकडून गोदावरी नदीच्या प्रवाहाकडे उताराने वाहत येणाऱ्या या नाल्यांचा श्वास कोंडण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून औरंगाबाद रोडवर येत असताना, रस्त्यावर पाणी साचते. त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर होतो. या नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक नाल्यांच्या भागातील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निसर्गनिर्मित नाल्यात मानवीय हस्तक्षेप वर्जित
नैसर्गिक नाले निसर्गनिर्मित असतात. त्यामुळे नाल्यात मानवीय हस्तक्षेप वर्जित आहे. जेथे नाले बुजवण्यात आलेत तेथे पावसाळ्यात वारंवार पाणी तुंबून पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. तसेच भूगर्भातील जल पातळी खालावते,असे मत देवांग जानी यांनी नोंदविले आहे.
महापालिका आयुक्त देणार का लक्ष?
मार्च महिन्यात रमेश पवार यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गोदावरी दूषित होऊ नये, यासाठी पाऊले उचलली आहेत. गोदाघाट परिसरात अतिक्रमण मोहीम राबविली. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी नैसर्गिक नाल्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करतील का, याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.