येवला: कोरोनाने तालुक्यात पुन्हा डोके वर काढले असून ग्रामीण भागात धुमाकूळ सुरू असल्याची परिस्थिती आहे. धुळगाव, अंगणगाव, नगरसूल, एरंडगाव येथे रोजच रुग्ण निघत आहे. ग्रामीण भागातील ३५ गावांना पुन्हा कोरोनाने विळखा घातला आहे. यामुळे नागरिक पुन्हा भयभीत होत आहे. विशेष म्हणजे शहराने कंट्रोल केले असून शहरात सध्या केवळ दोन रुग्ण आहेत.
दोन आठवड्यापूर्वी तालुक्याची रुग्ण संख्या ३० च्या खाली होती, आज हाच आकडा शंभरावर पोहोचला आहे. ग्रामीण भागातील तब्बल ३५ गावात सध्या रुग्ण आहेत. विशेष म्हणजे सातत्याने वेगवेगळ्या गावात एक-दोन रुग्ण निघत होते, मात्र मागील आठवड्यापासून ही संख्या अचानक वाढली आहे. धुळगाव तालुक्यातील हॉटस्पॉट बनले असून येथे २५ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
त्याखालोखाल अंगणगावला ८, पाटोदा ६, अंदरसूल ४, एरंडगाव दोन्ही ७, नगरसूल ८, पिंपळगाव लेप ५, वळदगाव ४ रुग्ण आहेत. नगरसुल येथे आज पुन्हा सहा तर एरंडगाव येथे पाच व धुळगाव येथे तीन रुग्ण निघाले असून १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील दोन तीन आठवड्यात रुग्ण संख्या दुहेरी संख्यावर पोचल्याने चिंतेत भर पडली आहे. प्रशासन व आरोग्य विभाग पुन्हा ॲक्शन मोडवर आला आहे.
शहरात नियंत्रण
येवला शहरासह तालुक्यानेही आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करत दुसऱ्या लाटेला बऱ्यापैकी नियंत्रित केले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही मतदारसंघात वेळोवेळी आढावा बैठका घेत रुग्णसंख्येत वाढ होणार नाही यासाठी सर्व विभागांना सूचना करत प्रसंगी कारवाई करण्याचेही आदेश दिल्याने रुग्ण कमी होण्यास मदत झाली.
पहिल्या लाटेत शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती.दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात तरी हीच अवस्था होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहरातील रुग्णसंख्येवर नियंत्रण आले आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन रुग्ण शहरात निघतात, याउलट ग्रामीण भागात हाच १८-२० वर पोहचला आहे.
आजही शहरात दोन रुग्ण असून शंभरावर रुग्ण ग्रामीण भागातीलच असल्याचे दिसते. प्रशासनाकडून जनजागृती,लसीकरण व उपाययोजना सुरू असून नागरिकांचीही साथ मिळणे तितकेच गरजेचे असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षद नेहते व विस्तार अधिकारी आर.एस.खैरे यांनी म्हटले आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता सर्वांची जबाबदारी वाढली आहे. ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये लसीकरण शिबिर सुरू असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. घराबाहेर पडल्यावर मास्क वापरावा, वेळोवेळी सॅनिटायझर फवारणी करावी, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी.- उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती,येवला
नागरिकांनो,एवढं कराच..!!
काळजी घ्या...गाफील राहू नका!
नियमितपणे मास्क वापरा
सोशल डिस्टन्स पाळा,गर्दी करू नका
सॅनिटायझर वापरा, वेळोवेळी हात धुवा!!
धुळगावला जनता कर्फ्यू
तालुक्यात ऑगस्ट महिनाअखेरपर्यत २५ च्या आत असलेली ऍक्टिव्ह रुग्णसंख्या सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ७२ वर तर आज १०५ वर पोहोचली आहे. धुळगाव कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. रोजच रुग्ण निघत असल्याने येथे जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेत गावात कडकडीत बंद पाळला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.