रावेर, (जि. जळगाव) - भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करून बदनामी करणाऱ्या मुंबईतील समाजसेविका अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर न्यायालयाचे न्यायाधीश डी. जी. मालवीय यांनी आज अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट उद्या (ता. 9) तयार करून प्रत्यक्ष बजावला जाणार आहे. त्यामुळे दमानिया जेथे असतील, तेथे त्यांना अटक होऊ शकते.
खडसे यांच्या जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण याबाबत दमानिया यांनी जळगावात येऊन खडसे यांच्यावर आरोप केले होते. त्यासंदर्भात भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी 28 जून 2016 रोजी बदनामीचा खटला दाखल केला होता.
याप्रकरणी सहा-सात तारखांना दमानिया उपस्थित राहिल्या नाहीत. तीन तारखांनंतर समन्स प्राप्त होऊनही दमानिया येथील न्यायालयात उपस्थित होत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट
बजावण्यासाठीचा अर्ज वकिलांनी आज न्यायालयात सादर केला. न्यायाधीशांनी तो मंजूर केला असून, शुक्रवारी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघेल, अशी माहिती मिळाली आहे.
|