नाशिक ः दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे सुस्वभावी, हजरजबाबी आणि नित्तीमत्तेचा आदर बाळगणारे नेते होते. त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व सर्वांसाठी आदर्शवत असेच आहे. त्यांचे भाषण सर्वांच्या हृदयाला स्पर्श करीत. त्यांच्यासारखा वक्ता लाखातून एक तयार होतो,अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी आज वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.
पक्षाच्या वसंत-स्मृती कार्यालयात पहिल्या स्मृतीदिनानिमित्त वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी सावजी बोलत होते. आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक सतीश शुल्क, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा स्वाती भामरे, गणेश कांबळे, सुजाता करजगीकर, देवदत्त जोशी आदी उपस्थित होते. वाजपेयी यांचा जीवनपट उलगडून दाखवत त्यांचे नेतृत्व कसे खुलले आणि ते पंतप्रधान झाल्यानंतर पदाला दिलेला न्याय पक्ष कधीही विसरणार नाही, असे सांगून सावजी म्हणाले, की 370 कलम आज रद्द झाल्याने आपण आनंद साजरा करत आहोत. मात्र कार्यकर्ता असताना वाजपेयी यांनी बजावलेली भूमिका दीर्घकाळ स्मरणात राहील.
जनता पक्षाच्या राजवटीत परराष्ट्रमंत्री असाना परराष्ट्रनिती काय असते हे वाजपेयी यांनी जगाला दाखवून दिले. ते प्रखर राष्ट्रनिष्ठा बाळगणारे होते. तत्व आणि निष्ठा यांच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. अटलजी आणि लालकृष्ण अडवाणी यांची पाच दशकांहून अधिक काळ घट्ट मैत्री होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या मित्रांसोबतची मैत्री प्रामाणिकपणे निभावली तरी अटलजींना ती खरी श्रद्धांजली ठरेल, असेही सावजी यांनी सांगितले.
वाजपेयींच्या काव्यरचना
अरुण शेंदूर्णीकर यांनी वाजपेयींच्या काव्यरचना सादर केल्या. श्री. शुक्ल यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यातील वाजपेयी यांच्या आठवणी सांगितल्या. शहराध्यक्षा भामरे, सोनल दगडे, राजेंद्र महाले, प्रशांत कोतकर आदींनी शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली. श्री. जोशी यांनी प्रास्ताविक केले. तुषार देवरे यांनी आभार मानले. |
|