भात लढ्यात सक्रीय सहभागाचे गाव वाडीवऱ्हे 

Live Photo
Live Photo

नाशिक ः मुंबई-आग्रा महामार्गावरील तीन वाड्यांसह दहा हजार लोकसंख्येचे गाव वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी). पत्री सरकार क्रांतीवीर नाना पाटील यांनी गावाला भेट दिली होती. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड्‌. रावसाहेब शिंदे हे "चले जाव' लढ्यात गावात भूमिगत होते. भात लढ्यात गावाने सक्रीय सहभाग घेतला. तत्कालिन आमदार पुंजाबाबा गोवर्धने, केरु पाटील, राजाराम पाटील आदींनी लढ्याचे नेतृत्व केल्याच्या आठवणींना ग्रामस्थांनी उजाळा दिलायं. 
लहांगेवाडी, जाधववाडी, आणि अचानकवाडीचा गावात समावेश आहे. हे गाव स्थलांतरित असून पूर्वी गावाचा काही भाग सैन्यदलाच्या क्षेत्रात होता. मारुती, वेताळबाबा, भवानी, दत्त, खंडेराव, महादेव, मरीआई, नवनाथ ही मंदिरे गावात आहेत. चंपाषष्ठीला इथे खंडेरावाची यात्रा भरते. तसेच दत्त जयंतीला दत्त मंदिराचा यात्रोत्सव होतो. गावात भजनी मंडळ असून माधव गवळी, गोविंद गवते, किसन कातोरे, सदाशिव कातोरे, विष्णू मावस्कर आदींचा सहभाग असतो. गणेश गवते हे गावचे कीर्तनकार. माधवराव कातोरे, संपतराव कातोरे नथू बाबा चोथे हे मल्ल पंचक्रोशित प्रसिद्ध होते. उन्हाळ्यात गावात पाण्याची अडचण असते. पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था गावात आहे. पूर्वी हे गाव तमाशा कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जात होते. सावळाराम मास्तर तमाशा मंडळ राज्यात प्रसिद्ध होते. या फडामध्ये गावातील तीस कलावंत होते. सावळाराम राजोळे यांनी हा फड सुरु केला होता. फडा मध्ये भगवान गोरे, बजरंग माळी, भागुजी मुर्तडक, राधाबाई नाशिककर हे नावाजलेले कलाकार होते. निवृत्ती लहांगे, निवृत्ती गुंड हे नृत्य करत असत. 
नाशिकचे खासदार ऍड्‌. उत्तमराव ढिकले यांचे पूर्वप्राथमिक शिक्षण गावात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील अण्णासाहेब कातोरे वसतिगृहामुळे विकासाला मदत झाली. शेती हा मुख्य व्यवसाय असून दुग्धोत्पादन केले जाते. घराघरात जनावरे आहेत. गावातून नथुबाबा मालुंजकर यांच्या स्मरणार्थ वाडीवऱ्हे ते पंढरपूर दिंडी सोहळा होतो. त्यात गावातील एक हजार वारकरी सहभागी होतात. वारकरी आणि महानुभव पंथाचे अनुयायी गावात आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी शरदराव केळकर यांना हे गाव खूप आवडायचे. त्यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न केल्याच्या आठवणी ग्रामस्थांनी आळवल्या आहेत. जैनमुनी आनंद ऋषीजी म. सा. , प्रीतीसुधाजी म. सा. यांची प्रवचने झाली आहेत. 

भात लढा लढणारे आमचे गाव असून गावात अनेक क्रांतीवीर येवून गेले होते. गावात मालुंजकर आणि शेजवळ वाडा असून गोसावी वाड्यात समाधी आहे. गावात पशुधन मोठे असून शेतकऱ्यांना दूध व्यवसाय वाढवण्यासाठी कार्यशाळा होणे आवश्‍यक आहे. 
- रामदास मालुंजकर (शेतकरी) 

आमच्या गावात वारकरी संप्रदाय मोठा आहे. गावातून दोन दिंड्या निघतात. लहान मुलांना गावात वारकरी शिक्षण दिले जाते. 
- माधव गवळी (वारकरी) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com